सातारा : राज्यातील वीज वितरण कंपनीच्या वीजदर वाढीस मंजुरी मिळाल्यामुळे आता सर्वसामान्याना चांगलाच शॉक बसत आहे. पूर्वी घरगुती वीजबिल शंभर ते दीडशे रुपये आकारले जात होते, आता तर अडीचशे ते तीनशे रुपयांपेक्षाही जास्त येत असल्याने सर्वसामान्य माणसांनी ते कसे भरावे, असा प्रश्न पडला आहे.
त्यात परत राज्यात प्रीपेड वीज मीटर बसवण्यात येणार आहे. त्यामुळे मोबाइल सारखे बॅलेन्स संपल्यानंतर लगेच तुमची लीगत देखील आता बंद पडेल. त्यामुळे अगोदरच महागाईने त्रस्त झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना आता सरकार व महावितरण कंपनी चांगलाच शॉक देत आहे.
खासगीकरणानंतर दिवसें दिवस वीजदर वाढतच आहे, महागाईच्या युगात विविध आवश्यक वस्तुंचे भाव वाढल्याने जनता त्रस्त झाली आहे. त्यातच महावितरणच्या मनमानी कारभारामुळे वीजदर आवाक्याच्या बाहेर गेल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. दरम्यान, राज्य सरकारने याचा विचार करून वीज दरवाढ कमी करावी कारण इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात वीजदर सर्वात जास्त आहेत.
राज्यात वीज वितरण कंपनीने चालू आर्थिक वर्षात एक एप्रिलपासून वीजेची दरवाढ केल्यामुळे ग्राहकांना चांगलाच भुर्दंड सहन करावा लागत आहे. सर्वसामान्य मजूर, शेतकरी यांना वीजबिल परवडत नसल्याने त्यांच्याकडे लाखो रुपयांची थकबाकी आहे. तर काहींची कमाई वीज बिल भरण्यातच जात आहे. त्यामुळे शासनाने वीज बिल कमी करावे, अशी मागणी होत आहे.