कोळिकोड : केरळच्या कोळिकोड जिल्ह्यात निपाह व्हायरसमुळे 2 जणांचा मृत्यू झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितलं आहे. तिथल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तज्ज्ञांची एक टीम केरळला रवाना करण्यात आल्याची माहितीसुद्धा त्यांनी दिली आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी केरळ सरकारला सर्वोतोपरी मदत करण्याचं आश्वासनसुद्धा त्यांनी दिलं आहे.
दरम्यान आणखी चार संशयितांचे नमुने तापसणीसाठी पुण्याच्या नॅशनल इंस्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये पाठवण्यात आले आहेत. केरळ सरकारनं तातडीनं कोळिकोडमध्ये कंट्रोलरूम सुरू केली आहे. तसंच लोकांना मास्क वापरण्याचं आवाहन देखील केलं आहे.
पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीच्या (NIV) शास्त्रज्ञांना वटवाघुळांच्या दोन प्रजातींमध्ये ‘निपाह’ व्हायरस आढळून आलाय. NIV च्या संशोधकांनी ‘जर्नल ऑफ इन्फेक्शन आणि पब्लिक हेल्थ’ मध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. वटवाघुळांवर संशोधन करणारे डॉ. महेश गायकवाड म्हणतात, “निपाह व्हायरसचे धोकादायक प्रकार प्रामुख्याने मलेशियातील वटवाघुळांमध्ये आढळून येतात. त्यामुळे लोकांनी घाबरून न जाता योग्य काळजी घेणं गरजेचं आहे.”
वटवाघुळांपासून पसरणाऱ्या ‘निपाह’ व्हायरस संसर्गामुळे 2018 मध्ये केरळात 18 लोकांचा मृत्यू झाला होता. भारतात आतापर्यंत चार वेळा ‘निपाह’ व्हायरसचा उद्रेक झाल्याची माहिती NIV ने दिलीये. “हेनिपाव्हायरस मलेशियातील टेरोपस व्हॅमपायरस प्रजातीच्या वटवाघुळांमध्ये सापडतो. ही प्रजाती भारतात सापडत नाही.” तर, भारतात पहिल्यांदाच R. lechenaulitti प्रजातीच्या वटवाघुळांमध्ये ‘निपाह’ व्हायरस सापडला असल्याची माहिती संशोधकांनी दिली आहे. संसर्गजन्य आजारतज्ज्ञ डॉ. राहुल तांबे म्हणतात, “NIV च्या शास्त्रज्ञांनी एक महत्त्वाचं संशोधन केलंय. आजार पसरू नयेत यासाठी अशा प्रकारची संशोधनं फार महत्त्वाची आहेत.” जागतिक आरोग्य संघटनेच्या 10 प्रमुख जीवघेण्या आजारांच्या यादीत निपाह व्हायरसचा समावेश आहे.
‘निपाह’ व्हायरस पसरण्याची कारणं?
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार,
- ‘निपाह’ व्हायरसचा संसर्ग वटवाघूळं आणि डुकरांपासून माणसांना होतो.
- एका संक्रमित व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होण्याची शक्यता असते.
- फ्रूट बॅट्स म्हणजे फळं खाणारी वटवाघूळं ‘निपाह’ व्हायरसचे नैसर्गिक वाहक असतात.
वटवाघूळ संशोधक डॉ. महेश गायकवाड सांगतात, “निपाह व्हायरस वटवाघुळांच्या लाळेमध्ये असतो. वटवाघुळांनी खालेल्ली उष्टी फळं माणसांनी खाल्ली, तर, व्हायरस आपल्या शरीरात जातो. त्यामुळे झाडाखाली पडलेली उष्टी फळं खाऊन नयेत.”
तर, जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, वटवाघूळांची लघवी किंवा लाळेने दुषित झालेली फळं किंवा फळांचे पदार्थ खाल्याने निपाह व्हायरसचा संसर्ग माणसांना होण्याची शक्यता असते.
‘निपाह’ संसर्गाची लक्षणं काय?
नानावटी रुग्णालयाचे संसर्गजन्य आजारतज्ज्ञ डॉ. राहुल तांबे सांगतात, “ताप, डोकेदुखी, कफ, घसादुखी आणि श्वास घेण्यात अडथळा ही निपाह संसर्गाची लक्षणं आहेत.”
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, काही रुग्णांमध्ये न्यूमोनिया आणि मेंदूला सूज येण्याची शक्यता असते.
निपाहचा विषाणू शरीरात गेल्यानंतर लक्षणं दिसून येण्यासाठी 4 ते 14 दिवसांचा कालावधी लागतो. RT-PCR टेस्ट करून निपाह व्हायरस संसर्गाचं निदान करण्यात येतं