देवळाली प्रवरा / प्रतिनिधी,
राज्यभरात प्रचंड खळबळ उडून देणारी घटना राहुरी तालुक्यातील आढाव नामक वकिल दाम्पत्यांचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.या खटल्यात अँड उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी राज्यभरातील वकील संघटने कडून करण्यात आली होती. या दुहेरी खुण खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम नियुक्ती झाली असुन दुहेरी हत्याकांडाचे कामकाज पाहण्यासाठी नगर येथिल न्यायालयात हजर झाले.
राहुरी येथील ॲड. राजाराम जयवंत आढाव व त्यांची पत्नी ॲड. मनीषा राजाराम आढाव या वकिल दाम्पत्यांचे दिनांक २५ जानेवारी २०२४ रोजी अपहरण करुन त्यांचा निर्घृण खूण करण्यात आला. त्याच दिवशी रात्री तालुक्यातील उंबरे येथील स्मशान भुमीतील विहिरीत आढाव दाम्पत्यांचे मृतदेह मिळून आले होते. या घटनेतील किरण ऊर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग, रा. उंबरे, भैया ऊर्फ सागर साहेबराव खांदे, रा. येवले आखाडा, शुभम संजीत महाडिक, रा. मानोरी, हर्षल दत्तात्रय ढोकणे, रा. उंबरे, बबन सुनिल मोरे, रा. उंबरे या पाच आरोपींना पोलिस पथकाने वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेऊन गजाआड केले होते.
वकिल दाम्पत्यांचे अपहरण केल्या नंतर त्यांचा निर्घृण खूण करून आरोपी हे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करीत होते. दिनांक २६ जानेवारी रोजी पहाटे दोन वाजे दरम्यान आरोपी हे त्यांच्या सुझूकी फ्रोन्झ या चारचाकी वाहनातून पसार झाले होते. पोलिस प्रशासनाने तपासा दरम्यान सुरुवातीला आढाव दाम्पत्यांची फोर्ड फिएस्टा ही चारचाकी गाडी राहुरी न्यायालयाच्या प्रवेश द्वारा जवळून ताब्यात घेतली. त्यानंतर आढाव यांची दुचाकी न्यायालय परिसरातील मागच्या आवारात आढळून आली. पोलिस प्रशासनाने आढाव यांची तसेच आरोपी यांची चारचाकी वाहने ताब्यात घेतली. अहमदनगर येथील ठसे तज्ञांच्या पथकाने दोन्ही चारचाकी वाहनांची बारकाईने तपासणी केली. या दरम्यान ठसे तज्ञांनी आढाव यांच्या गाडीतून एक हातमोजा, एक तूटलेले सीम कार्ड, दोरी, मयत मनीषा आढाव यांच्या पायातील एक बूट तसेच आरोपींच्या गाडीतून पाणी बाँटल, प्लास्टिक ग्लास, माती तसेच महिलेच्या डोक्याचे काही केस ताब्यात घेऊन ठसे मिळवीले. दिनांक ३१ जानेवारी रोजी सायंकाळी राहुरी येथील नगर मनमाड रस्त्यावर मुळा नदीच्या पुलाखाली फेकून दिलेली मयत मनीषा आढाव यांची पर्स पोलिस प्रशासनाने पुरावा म्हणून ताब्यात घेतली. त्यानंतर हत्याकांडांचा तपास सीआयडी कडे वर्ग केला होता. दरम्यान जिल्ह्यासह राज्यभरातील वकिल संघाकडून मोर्चे व आंदोलन करण्यात आले. खटला जलदगती न्यायालयात चालवून या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली होती.
खुण खटला ६ मे २०२४ रोजी अहमदनगर येथील न्यायालयात सुरु झाला. आज दि. २० जुलै रोजी ॲड. आढाव दाम्पत्य खूण खटल्यात सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे हजर झाले. आरोपी किरण दुशिंग याच्या वतीने एस. एस. पाठक व आरोपी हर्षल दत्तात्रय ढोकणे याच्या वतीने पी. के. फळे हे वकिल हजर झाले आहेत. दरम्यान आरोपी हर्षल दत्तात्रय ढोकणे याने माफीचा साक्षीदार होण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्याचा अर्ज आज २० जुलै रोजी स्वीकारण्यात आला. तर आरोपी शुभम संदिप महाडिक याने देखील आज माफीचा साक्षीदार होण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. सदर खटला अहमदनगर येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. के. यारलागड्डा यांच्या समोर सुरु आहे.
विशेष सरकारी वकील अँड उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाल्याने वकील संघटनाच्या समाधान व्यक्त केले असुन या खटल्याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.