पुसेगाव : रब्बी हंगामातील गहू पिकाच्या काढणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. याकरिता परिसरातील शेतकरी हार्वेस्टर यंत्राचा आधार घेताना दिसून येत आहेत.
मजुरांचा तुटवडा ही एक समस्या शेतकऱ्यांना भेडसावत आहे.
त्यामुळे हार्वेस्टर शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरत आहे. या परिसरात पंजाब, हरयाणा या परिसरातील हार्वेस्टर यंत्रे गव्हाच्या मळणीसाठी दाखल होत असतात. यंदाच्या रब्बी हंगामात गहू पिकाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे.
त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांचे गहू पीक काढणीबरोबर आले आहे. हे पीक काढण्यासाठी शेतकरी यंत्राचा आधार घेत आहे. या यंत्रामुळे कमी वेळेत आणि कमी खर्चात अधिक प्रमाणात गहू पिकाची काढणी होत आहे.
यंत्राच्या साह्याने गहू काढला तर साधारणपणे अर्ध्या तासात एक एकर क्षेत्रातील गहू पिकाची काढणी होते. हार्वेस्टरच्या साहाय्याने मळणी केली तर तीन हजार रुपये एकर अशी मजुरी पडते. मजुरांची टंचाई तसेच मजुरीचे वाढते दर यामुळे शेतकरी या यंत्राच्या साहाय्याने गहू मळणे अधिक सोयीचे समजत आहेत.
– नीता राजेघाटगे (प्रगतीशील शेतकरी, बुध)