पुसेगाव दि. 14
भटक्या विमुक्त संघटनेचे पद्मश्री उपराकार लक्ष्मणरावजी माने यांनी जे प्रश्न मांडले ते प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हे प्रश्न घेऊन उभा राहील व आपल्या परीने शक्य आहे ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
भटक्या विमुक्त संघटनेचा कृतज्ञता सत्कार सोहळा सातारा येथील राष्ट्रवादी भवन मध्ये आयोजित करण्यात आला होता, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय जयंतरावजी पाटील बोलत होते.यावेळी आमदार मकरंद पाटील, भटक्या विमुक्त संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष पद्मश्री उपराकार लक्ष्मणराव जी माने, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सुनील माने, दीपक पवार, पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष प्राध्यापक कविता मेहेत्रे, राष्ट्रवादी भटक्या विमुक्त सेलचे जिल्हाध्यक्ष अशोक जाधव, सातारा जिल्हा भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे अध्यक्ष रवी गायकवाड, महाराष्ट्र सरचिटणीस रामभाऊ जाधव, नारायण जावळीकर उपस्थित होते.
पाटील पुढे म्हणाले महाराष्ट्राचे वातावरण बदलायला लागले आहे. महाराष्ट्राचे जे आपले दैवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा ज्योतिबा फुले या दैवताला तडा लावण्याची विधान जाणीवपूर्वक सत्तारूढ पक्षातून व्हायला लागले आहेत. ज्या महाराष्ट्रामध्ये शंभर ते दीडशे वर्ष आपण दैवत मानून काम करीत आहे. अशा आपल्या दैवतांना या दैवताबद्दल अपशब्द वापरून तडा देण्याचे कार्य चालू आहे. आणि असे सांगण्याचे जे उद्योग करत आहेत ते आपोआप चुकून होत नाही,ही शिकलेली लोक आहेत. यांना काय बोललं पाहिजे हे चांगलं माहित आहे, आणि असे असून सुद्धा तुमच्या दैवताबद्दल श्रद्धा आहे त्या श्रद्धां असलेल्या दैवतांना तडा देण्याचे काम चालू आहे. तुमचा बेस मोडला की त्यांचं काम सोप्प होईल,असा हा राजकीय सामाजिक डाव आहे. ही माणसं वेडी नाहीत ही चुकीच्या विधानाची टेस्ट चालू आहे. या विधानाचे परिणाम काय होतात हे पाहिलं जातंय आणि याच धरतीवर पुढील त्यांचं धोरण आखलं जाणार आहे. यासाठी आपली ज्या दैवतावर आढळनिष्ठा आहे त्यासाठी जागृत होण्याची गरज आहे. आणि आपण जागृत झालो नाही तर याची आपल्या सर्वांना मोठी किंमत मोजावी लागणार आहे. या संघटनेने या पन्नास वर्षांमध्ये जी जडणघडण केली संघटनेला जोडण्याचं काम केलं,विखुरलेला समाज जोडण्याचे काम सोपे नाही आणि हे काम माननीय उपराकार पद्मश्री लक्ष्मणराव माने यांनी केले आहे. आणि या संघटनेच्या जडणघडणीमध्ये ज्यांनी 50 वर्षे कार्य केले अशा पुरस्कर्त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी उपराकार पद्मश्री लक्ष्मणरावजी माने यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले 40 ते 45 भटक्या विमुक्त संघटनेचे गट एकत्र करून या संघटनेने जे कार्य केले त्यामध्ये विविध प्रकारचे आंदोलन असतील विविध प्रकारचे रस्ता रोको असतील कोणी पोलिसाचा मार खाऊन तुरुंगवास भोगला असेल अशांना काही देता नाही आलं तर कमीत कमी कृतज्ञता सन्मानपत्र देऊन त्यांचे अभिनंदन करणे गरजेचे होते. तसेच या पुढील काळातही संघटनेबरोबर राहून संघटना वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगून नामदार जयंत पाटील यांचे बरोबरचे घडलेले प्रसंग व आठवणींना उजाळा दिला व त्या काळात जयंत रावजी पाटील यांनी केलेले कार्याची माहिती दिली तसेच बंद पडत असलेल्या शाळांना पुनर्जीवन मिळाली पाहिजे, व आश्रम शाळांना भोजन भत्ता वाढवण्याची मागणी माने यांनी जयंत रावजी पाटील यांच्याकडे केली. यावेळी आमदार मकरंद आबा पाटील, पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी महिला अध्यक्ष कविता म्हेत्रे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुनील माने, भटक्या मुक्त राष्ट्रवादी सेल जिल्हाध्यक्ष अशोकराव जाधव, राज्य सरचिटणीस रामभाऊ जाधव, तसेच अन्य मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमास माननीय हरिदास जाधव, रमेश वैदू, मच्छिंद्र जाधव, राजेंद्र भोसले, बाबुराव पवार, सुभाष राठोड, तसेच सातारा जिल्ह्यातील भटक्या विमुक्त संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी सेलचे जिल्हाध्यक्ष अशोक जाधव यांनी केले सूत्रसंचालन राज्य सरचिटणीस नारायण जावलीकर तर आभार राज्य सरचिटणीस रामभाऊ जाधव यांनी मानले.