मोरयाच्या गजरात तासगावचा रथोत्सव उत्साहात पार पडला, उत्सवाचे यंदा २४४ वे वर्ष

0

सांगली : गुलालखोबर्‍याबरोबरच पेढ्यांची उधळण करीत आणि मोरयाच्या गजरात बुधवारी तासगावचा अडीच शतकांची परंपरा असलेला रथोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. या रथोत्सवाला यंदा तासगावचे संस्थानिक पटवर्धन घराण्यातील वादाची किनार लाभली.
मराठेशाहीचे शेवटचे सरसेनापती परशुरामभाऊ पटवर्धन यांनी तासगावमध्ये रथोत्सवाची परंपरा सुरू केली. यंदा या उत्सवाचे २४४ वे वर्ष होते. दक्षिण भारतीय स्थापत्य कलेचा प्रभाव असलेले एकमेव गणेश मंदिर तासगावमध्ये असून गणेश चतुर्थीनंतर दुसर्‍याच दिवशी गणपती पिता काशीविश्‍वेश्‍वर यांच्या भेटीसाठी रथातून जातो अशी परंपरा आहे. यासाठी गणेश मंदिरातून गणपतीची पंचधातूची मूर्ती सात मजली रथातून आणि मानवी हातांनी ओढली जाते. सातशे मीटरचे हे अंतर पार करण्यास रथाला पाच ते सात तास लागतात.

आज दीड दिवसाच्या गणपती उत्सवाची सांगता रथोत्सवाने साजरी झाली. या रथोत्सवामध्ये हजारो भाविक, ढोल-ताशांचा निनाद, मानवी मनोरे आणि मोरयाचा गजर करीत रथ ओढण्यात आला. रथोत्सवाचे नेतृत्व गौरी हत्तीणने केले. या रथोत्सवासाठी मंत्री शंभोराज देसाई, भाजपाचे तासगाव विधानसभा प्रमुख प्रभाकर पाटील, राष्ट्रवादीचे रोहित पाटील यांच्यासह माजी नगरसेवक व महाराष्ट्र व कर्नाटकातून आलेले हजारो भाविक सहभागी झाले होते. भाविकाकडून केळाच्या खुटांनी सजविलेल्या रथावर खोबरे, पेढे आणि गुलालाची मुक्त हाताने उधळण करण्यात येत होती.

या वर्षीच्या रथोत्सवामध्ये पटवर्धन कुटुंबामध्ये असलेला संघर्ष भाविकांमध्ये चर्चेचा विषय बनला होता. प्रमुख वारसदार राजेंद्र पटवर्धन आणि त्यांची कन्या आदिती पटवर्धन यांच्यात वारसाहक्कावरून कौटुंबिक वाद आहे. आदिती पटवर्धन यांनी रथोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाची परवानगी घेतली असून गणपती पंचायतन संस्थानचा हा वाद यंदाच्या रथोत्सवामध्ये वादाचा विषय ठरला होता. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here