संगमनेर : विविध परंपरा लाभलेल्या महाराष्ट्र राज्याने विकासात देशात अग्रगण्य राज्य म्हणून लौकिक निर्माण केला आहे.संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अनेकांनी हुतात्मे पत्करले असून मोठ्या संघर्षातून मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. देशाच्या विकासात महाराष्ट्राचा मोठा वाटा असल्याचे गौरवोउद्गार काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले.
महाराष्ट्र दिनी सोमवार दि. १ मे ला सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात शासकीय ध्वजारोहन काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा विधिमंडळातील गटनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे ,प्रभारी तहसीलदार गणेश तळेकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्यासह सर्व विभागांचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्याची ७५ वर्ष आपण साजरी करत आहोत.याचबरोबर महाराष्ट्राच्या निर्मितीची ६३ वर्ष आपण साजरी करत आहोत. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण व देशाचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुढाकारातून १ मे ६० रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्य झाले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अनेकांनी हुतात्मे पत्करले आहे. ६३ वर्षाच्या वैभवशाली वाटचालीतून महाराष्ट्र हे देशातील सर्वात अग्रगण्य राज्य म्हणून ओळखले जात आहे.महाराष्ट्र दिनाबरोबर कामगार दिन ही मोठ्या उत्साहाने साजरा होत असुन महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये कामगार बंधूंचाही मोठा वाटा राहिला आहे. कृषी, सहकार ,औद्योगीकरण, शिक्षण, सांस्कृतिक व वैभवशाली वातावरण हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य असून यापुढेही राज्याचे नाव उज्वल करण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्ताने विविध शालेय विद्यार्थ्यांनी दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.