श्रीनगर : काश्मीरच्या अनंतनाग परिसरामध्ये कोकरनाग येथे भारतीय लष्कर आणि कट्टरतावाद्यांमध्ये चकमक झाली. बुधवारी झालेल्या या चकमकीत कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष धोंचक आणि डीएसपी हुमायूं मुजम्मिल भट्ट धारातिर्थी पडले. या अधिकाऱ्यांशिवाय भारतीय सैन्यातील एक जवान देखील यामध्ये शहीद झाला आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार या सैनिकाबाबत अद्याप फारशी माहिती मिळू शकलेली नाही.
बंदी असलेल्या रेजिस्टन्स फ्रंट नावाच्या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. असं म्हणतात की पाकिस्तानच्या लष्कर-ए-तय्यबा संघटनेची ही समातंर संघटना आहे. पीटीआयने सांगितलेल्या माहितीनुसार, “अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की ही तीच दहशतवादी संघटना आहे जिने चार ऑगस्टला कुलगाममध्ये तैनात असणाऱ्या भारतीय सैन्यावर हल्ला करून तीन जवानांची हत्या केली होती.”
या हल्ल्यानंतर सैन्याकडून हल्लेखोरांचा शोध सुरु असून, हल्लेखोरांना पकडण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली जात आहे. काश्मीर पोलिसांनी सोशल मीडियावर या हल्ल्याची प्रतिक्रिया देतांना गुरुवारी लिहिलं होतं, “या मोहिमेदरम्यान सुरक्षादलांनी लष्कर-ए-तय्यबाच्या दोन दहशतवाद्यांना घेरलं असून, यामध्ये उजैर खान देखील आहे.” मागील काही वर्षांमध्ये झालेला हा सगळ्यांत मोठा हल्ला आहे.