कोयनानगर : मागच्या ४ महिन्यात राज्यात अत्यंत कमी पाऊस झाल्याने महाराष्ट्रातील अनेक धरणे अद्यापही निम्मी भरली नाहीत. दरम्यान महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणाच्या जलाशयात थेंबे थेंबे तळे भरे अशी परिस्थिती झाली आहे.
मागच्या चार महिन्यात ९० टक्क्यांवर पाणी पातळी गेली आहे. दरम्यान मागच्या दोन दिवसांपासून सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात जोरदार पाऊस होत आहे.
तसेच सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील धरणक्षेत्रात पाऊस सुरू झाला असून, २४ तासांत महाबळेश्वरला सर्वाधिक ९३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर मागच्या चार महिन्यांपासून थोडे थोडे का होईना ९० टीएमसीपर्यंत कोयनेचा जलसाठा गेला आहे. तर धरण भरण्यासाठी अजून १५ टीएमसी पाण्याची गरज आहे. दरम्यान पुढच्या काही दिवसांत आणखी पडण्याची गरज आहे.
मागच्या ४ महिन्यात अल निनोच्या स्थितीमुळे पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहिले आहे. जुलै महिना सोडल्यास उर्वरित महिन्यात अत्यंत कमी पावसाची नोंद झाली. तर सप्टेंबर महिनाही अर्ध्याहून अधिक संपला आहे. तरीही मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला नाही. पावसाची तूट कायम आहे.
मागील दोन दिवसांपासून पश्चिम भागात पाऊस पडू लागला आहे. त्यामुळे धरणांत पाणीसाठा वाढू लागला आहे. २४ तासांत कोयनानगर येथे २९ तर नवजाला २२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरला ५३ मिलिमीटर पडल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.
मागच्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने धरणे वेळेत भरली होती. गतवर्षी १९ सप्टेंबरला कोयना धरणात १०४.६० टीएमसी पाणीसाठा होता. यंदा अजून ९० टीएमसीचा टप्पाही पार केलेला नाही. तर गतवर्षी आतापर्यंत कोयनेला ४४३४ मिलिमीटर पाऊस पडला होता. तर नवजाला ५३९० आणि महाबळेश्वरला ५७९० मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली होती.