जयसिंगपूर : शिरोळ तालुका धनगर आरक्षण समितीच्यावतीने उदगांव (ता.शिरोळ) येथील सांगली-कोल्हापूर महामार्गावरील टोलनाक्यावर गुरुवारी महामार्ग रोखून आंदोलन करण्यात आले. यावेळी धनगर आरक्षण हक्काचे आहे. ते तातडीने द्यावे अन्यथा राज्यभरात चक्काजाम आंदोलन करणार असल्याचा इशारा धनगर समाजातील नेत्यांनी दिला आहे. अखेर मंडळ अधिकार्यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. दरम्यान, या आंदोलनात बकरीही रस्त्यावर सोडली होती. परिणामी सांगली-कोल्हापूर महामार्गावर वाहतुक ठप्प होऊन वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या.
गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास शिरोळ तालुक्यातील धनगर समाजातील पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्रित आले होते. यावेळी अशोक कोळेकर, रामचंद्र डांगे, अमर पुजारी, संजय अनुसे, रामभाऊ बंडगर, संदिप पुजारी, नवनाथ गावडे यांनी मनोगत व्यक्त केले. यात धनगर आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. धनगर समाज एस.टी.मधील आरक्षणाबाबत कार्यवाही यासाठी शासनाकडे मागणी करीत आहे. मात्र, शासन याकडे दुर्लक्ष करीत असून समाजावर ७० वर्षापासून अन्याय होत आहे. शासनाने त्वरित धनगर समाजाचा प्रश्न मार्गी लागावा अन्यथा चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिला.दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने धनगर समाजाला पाठींब्याचे पत्र दिले. यावेळी सावकार मादनाईक, शैलेश आडके, विठ्ठल मोरे उपस्थित होते. तर सांगली-कोल्हापूर महामार्ग रोखल्याने महामार्गावरील सर्व वाहतुक ठप्प झाली होती. वाहनाच्या प्रचंड रांगा लागल्या होत्या. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.यावेळी सागर पुजारी, संदीप पुजारी, अमोल पुजारी, विशाल खिलारे, संदीप गावडे, विजय सलगरे, दिपक ठोंबरे, सर्जेरा व शेळके, अरुण गावडे, चंद्रकांत तेरवाडे यांच्यासह धनगर समाजाचे पदाधिकारी, समाजबांधव उपस्थित होते.