अपयशातून यशाचा मार्ग तयार करा – आ.आशुतोष काळे

0

ब्राम्हणगाव येथे ‘आमदार चषक २०२४’ भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा संपन्न

कोळपेवाडी वार्ताहर :- स्पर्धा कोणतीही असो यश अपयश हा स्पर्धेचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे प्रत्येक स्पर्धेत आपल्याला यश मिळेलच असे नाही व सतत अपयश मिळेल असेही नाही. त्यामुळे मिळणाऱ्या यशाने हुरळून जावू नये व येणाऱ्या अपयशातून निराश देखील होवू नये. मिळालेल्या अपयशात झालेल्या चुका सुधारून अपयशातून यशाचा मार्ग तयार करा असा मौलिक सल्ला आ. आशुतोष काळे यांनी दिला.

श्रीराम नवमीनिमित्त ब्राम्हणगाव येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक कार्यकर्ते राहुल सोनवणे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या ‘आमदार चषक २०२४’ भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याची नाणेफेक आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात येवून विजेत्या संघाना त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले याप्रसंगी त्यांनी खेळाडूंशी संवाद साधत त्यांना शुभेच्छा दिल्या.

ते म्हणाले की, सध्याच्या धकाधकीच्या व धावपळीच्या जीवनात उत्तम आरोग्य अत्यंत महत्वाचे असून निरोगी आरोग्यासाठी नियमित व्यायाम आणि योग्य आहार गरजेचा आहे. त्यामुळे वयाचे बंधन न बाळगता सर्वांनीच स्पर्धात्मक क्रिकेट स्पर्धेत सहभाग घ्यावा. खेळाडूंच्या क्रीडा गुणांना वाव मिळावेत यासाठी त्यांना आवश्यक सोयी सुविधा निर्माण करून देण्यासाठी माझे प्रयत्न सुरु आहेत. राष्ट्रीय खेळाडू निर्माण होण्यासाठी अशा स्पर्धां उत्तम व्यासपीठ असून त्या माध्यमातून गुणवान खेळाडू घडले जावून त्यांनी आपल्या कोपरगावचा नावलौकिक राज्यासह देशात वाढवावा अशी अपेक्षा व्यक्त केली.  

 या स्पर्धेत एकूण ३२ संघ सहभागी झाले होते. स्पर्धेचा अंतिम सामना जगदंबा मैदानावर डीसीसी (दत्त नगर क्रिकेट क्लब) श्रीरामपूर व ब्राम्हणगाव क्रिकेट क्लब या दोन संघांत पार पडला संगमनेर क्रिकेट क्लब या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करतांना ५ षटकात ४५ धावा केल्या. विजयासाठी आवश्यक असलेले ४६ धावांचे लक्ष्य ब्राम्हणगाव क्रिकेट संघाने ९ गडी राखून आरामात पार करीत प्रथम क्रमाकाचे ४४,४४४/-रुपयांचे रोख बक्षीस पटकावत आमदार चषकावर आपले नाव कोरले तर डीसीसी (दत्त नगर क्रिकेट क्लब) श्रीरामपूर या संघाला दुसऱ्या क्रमांकाच्या ३३,३३३/-रुपयांच्या बक्षीसावर समाधान मानावे लागले.तीसरे २२,२२२/- रुपयांचे तिसरे बक्षीस संगमनेर क्रिकेट क्लबने तर ११, १११/-रुपयांच्या चौथ्या बक्षिसाचा मानकरी कोपरगावचा संघ ठरला.  

यावेळी कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे संचालक श्रावण आसने,राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस विठ्ठलराव आसने, तुकाराम उळेकर, गणेश आसने, रवींद्र पिंपरकर, बाबासाहेब जगताप, पांडुरंग सोनवणे, तुकाराम सोनवणे, नानासाहेब सोनवणे, एकनाथ शिंगाडे, शरद उळेकर, आनंद भुजाडे, अशोक बनकर, गणेश आहेर, गणेश बर्डे, रविंद्र शिंदे, सोमनाथ फापाळे, गणेश फापाळे, जावेद शेख, प्रमोद तनपुरे आदींसह सहभागी संघाचे खेळाडू व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here