संतप्त नागरिकांनी दिले पोलिसांना निवेदन… कारवाई करा अन्यथा पोलीसां विरोधात आंदोलन..
देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील विश्वकर्मा चौकात दोन कुटुंबात लहान मुलांच्या खेळण्यावरुण वाद झाल्याची घटना गुरुवारी रात्री दरम्यान घडली. यातील एका कुटुंबाने श्रीरामपूर येथील १०० ते २०० लोकांना बोलावून घेतले.या जमावाने हातात घातक शस्त्र व काठ्या दांडे शहरात दहशत निर्माण करून वाद मिटवण्यासाठी गेलेल्या नागरिकांना मारहाण करत नंग्या तलवारी फिरवल्याने देवळाली प्रवरा शहरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.
देवळाली प्रवरा येथील विश्वकर्माकर्मा चौकात गुरुवारी रात्री लहान मुलांच्या खेळण्यावरुण दोन कुटुंबात वाद झाले.या वादातून एका कुटुंबाने श्रीरामपूरला फोनाफोनी करून देवळाली प्रवरात तरुणांचा मोठा जमाव बोलावून घेतला.काही वेळातच जवळपास १०० ते २०० जण हातात घातक शस्त्र व काठ्या दांडे घेऊन हजर झाले. दहशत पसरविण्यास सुरवात केली. यावेळी चौकातील काही नागरिक वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करीत असताना श्रीरामपुरच्या लोकांनी त्यांना मारहाण केल्याचे समजते. घटनास्थळी व्यापारी संघटनचे अध्यक्ष सतीश वाळूंज यांच्यासह काही जागृत नागरिक व राहुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी धाव घेऊन वाद मिटविला. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला.
या दहशती नंतर देवळालीतील सर्व पक्षिय नागरिकांनी राहुरी पोलीस स्टेशनला निवेदन दिले. दिलेल्या निवेदनात माजी आ. चंद्रशेखर कदम, माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, संतोष चोळके,सतिष वाळुंज, सचिन ढुस, शहाजी मुसमाडे, संतोष चव्हाण, भागीरथ कदम , संदीप मुसमाडे, सचिन कोठुळे, सुधीर टिक्कल आदी नागरिकांनी पोलीस प्रशासनास निवेदन देत संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा राहुरी पोलीसांच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे