कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरासह हद्दवाढ झालेल्या भागाच्या विकासासाठी देखील कोट्यावधी रुपयांचा निधी दिला असून या भागातील विकासाचे प्रश्न सोडविले आहे. तुमचे आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे भविष्यात कोपरगाव शहरासह हद्दवाढ झालेल्या भागाचे प्रश्न सोडवून कोपरगावची विकसित शहर म्हणून नवी ओळख निर्माण होईल असे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे. कोपरगाव शहरात नगरपरिषद हद्दवाढ झालेल्या भागातील २३ लक्ष रुपये निधीतून नागरे पेट्रोल पंप ते ब्रिजलालनगर रस्ता व ३० लक्ष रुपये निधीतून प्रभाग क्र १ मध्ये आयटीआय कॉलेजसमोरील रस्ता डांबरीकरण करणे आदी कामाचे भूमिपूजन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, मा. आ. अशोकराव काळे यांनी विरोधी पक्षाचे आमदार असतांना २०१४ च्या अगोदर आयटीआय कॉलेजची इमारत बांधली होती. परंतु त्यावेळी निधी कमी पडला त्यामुळे काम अर्धवट राहिले. त्यानंतर सत्तांतर झाले आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी सत्ताधारी पक्षाच्या असतांना देखील त्यांना हे काम पूर्ण करण्याचे सुचले नाही त्यामुळे त्यांनी या कामाकरीता कुठलाही पाठपुरावा केला नाही त्यामुळे २०१९ पर्यत हे काम अपूर्णावस्थेतच राहिले होते. आयटीआय कॉलेज तसेच डिपॉल शाळेची इमारत या परिसरात असल्यामुळे शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच येथील नागरिकांना खराब रस्त्यामुळे येणारी अडचण लक्षात घेवून मागील अनेक वर्षांपासून विकासाच्या बाबतीत अतिशय मागासलेला हा भाग विकास रेषेत आणता आला याचे मोठे समाधान आहे. ज्याप्रमाणे दिलेला शब्द पूर्ण करून कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडवून दाखविला त्याप्रमाणे तुमचे आशीर्वाद पाठीशी ठेवा यापुढील काळात हद्दवाढ झालेल्या भागासह कोपरगाव शहराचे सर्व प्रश्न सोडवून दाखवून आपल्या सहकार्यातून कोपरगावची विकसित शहर म्हणून नवी ओळख निर्माण करू अशी ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी यावेळी दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोपरगाव शहर विकासाच्या वाटेवर आले——-
कोपरगाव तालुक्याच्या इतिहासात आजपर्यंत सर्वात जास्त विकास कामे आ.आशुतोष काळे यांच्या कार्यकाळात झाले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या सहकार्यातून तीन हजार कोटीचा निधी मतदार संघाला आणणे हा इतिहास झाला आहे. कोपरगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ५ नंबर साठवण तलावाच्या माध्यमातून त्यांनी सोडविला असून नळाला आठ-दहा व टंचाई काळात तर पंधरा दिवसांनी येणारे पाणी आता तीन दिवसाआड येत आहे. येत्या काही दिवसात नियमित पाणी देण्याचे नियोजन आ.आशुतोष काळे यांनी केले असून कोपरगाव शहर विकासाच्या वाटेवर आले आहे अशा बोलक्या प्रतिक्रिया यावेळी उपस्थित नागरिकांनी दिल्या.