स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एप्रिलमध्ये – बावनकुळे

0

पुणे : गेल्या काही काळापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नेमक्या कधी होणार ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाचा युक्तिवाद सुरू आहे. ओबीसी आरक्षणावर लक्करच निर्णय होईल. त्यानुसार न्यायालय निवडणूक घेण्यास मान्यता देईल. फेब्रुवारीत निकाल आला, तर एप्रिल महिन्यात निवडणुका होऊ शकतील, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. शनिवारी (८ फेब्रुवारी) पिंपरी-चिंचवड येथे ते माध्यमांशी बोलत होते.

भाजप प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आता खूप दिवस महापालिका नगरसेवकांविना राहु नयेत. लवकरच या निवडणुका होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. लवकर निकाल देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली जाणार आहे. फेब्रुवारीत निकाल आला, तर एप्रिल महिन्यात निवडणुका होऊ शकतात. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर करताच महाराष्ट्र शासन मनुष्यबळ, व्यवस्था उपलब्ध करून देईल. त्यामुळे निवडणुकीसाठी सज्ज राहावे. काहीही करून पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक जिंकायची आहे. त्यासाठी सदस्य नोंदणी वाढवावी. ४ लाख सदस्य शहरातून वाढावेत. प्रत्येक बूथवरून ५ टक्के सक्रिय सदस्य करावेत. सदस्य नोंदणीसाठी शहराचे दोन जिल्हे करावेत, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

भाजप स्वबळावर निवडणूक लढविणार आहे का ? असा प्रश्न माध्यमांनी विचारला असता ते म्हणाले की, महापालिकेची निवडणूक स्थानिक आहे. त्यामुळे स्थानिक कमिटीला विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाईल. महाराष्ट्र म्हणून महायुतीने सोबत लढले पाहिजे, असा निर्णय घेतला आहे. पक्ष आणि मंत्र्यांमध्ये समन्वय राहावा, खात्याचे निर्णय जनतेपर्यंत पोहोचावेत, यासाठी भाजपच्या मंत्र्यांकडे पक्षाच्या कार्यकत्यांची नियुक्ती केली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here