शासकीय योजनांवर अवलंबून असणाऱ्या रुग्णांचे हाल ;शासन पातळीवर संप मिटविण्याची कोणतीही हालचाल नाही .
अमरावती (प्रतिनिधी):- महाराष्ट्र आणि केंद्र शासनाच्या एकत्रित महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे काम करणारे आरोग्य मित्रांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व आरोग्यमित्र 12 फेब्रुवारी 2025 पासून बेमुदत संपावर जाणार होते. परंतु राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी 7 फेब्रुवारी दुपारी बारा वाजता आरोग्य मित्रांच्या मागण्याविषयी चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली. या बैठकीमध्ये राज्य आरोग्य हमी सोसायटीचे सीईओ म.अण्णासाहेब चव्हाण साहेब, डेपोटी सीईओ म.विनोद बोंद्रे साहेब,तसेच सहाय्य संस्थेचे (TPA) पदाधिकारी आणि महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी.एल. कराड साहेब, उपाध्यक्ष एल. आर .राव, कॉ.राहुल गायकवाड, कॉ.गणेश शिंदे, कॉ.किरण ढमढेरे, कॉ.वैशाली साखरे, कॉ. संदीप फणसे हे उपस्थित होते.
या बैठकीमध्ये आरोग्य मित्रांच्या विविध मागण्यावर चर्चा झाली. यामध्ये किमान वेतन, वार्षिक वेतनवाढ, आरोग्य मित्रांच्या रजासह इतर मागण्यांची सविस्तर सकारात्मक चर्चा झाली. सहाय्य संस्थेचे (TPA) पदाधिकारी यांनी आरोग्य मित्र मागण्या संदर्भात दहा दिवसांची मुदत मागितली व राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म.अण्णासाहेब चव्हाण यांनी सहमती दर्शवली यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ डी.एल.कराड यांनी सांगितले की राज्यातील सर्व जिल्ह्यातील आरोग्य मित्र पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून मुदत वाढ देऊ असं सांगितले. त्यानंतर राज्यातील सर्व आरोग्यमित्र कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मीटिंग घेऊन या मीटिंगमध्ये दहा दिवसांची वेळ वाढवून देण्याचा निर्णय झाला. मात्र दिनांक 17 फेब्रुवारी पर्यन्त कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे आज दिनांक 18 फेब्रुवारी 2025 पासून सर्व महाराष्ट्रातील आरोग्य मित्र संपावर जात आहे.