कोळपेवाडी वार्ताहर– माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात२००५ साली विधानसभा अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करून रांजणगांव देशमुख उजनी उपसा जलसिंचन योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवत उर्जितावस्थेत आणले. व स्वत: आर्थिक झळ सोसून हि योजना पूर्ववत सुरु ठेवून सलग १० वर्ष हि योजना यशस्वीपणे चालविली हे जिरायती भागातील गावातील सर्वच नागरिक जाणून आहेत. त्यामुळे ज्यांनी हि योजना बंद पाडण्याचे पाप केले त्यांची साक्ष जनतेच्या दरबारात अदखलपात्र असल्याचा पलटवार रांजणगांव देशमुख उजनी उपसा जलसिंचन योजनेचे अध्यक्ष बाबुराव थोरात यांनी मा.आ.कोल्हेंवर केला आहे.
रांजणगांवदेशमुख, जवळके, धोंडेवाडी, वेस, सोयगाव, अंजनापूर, बहादरपूर, मनेगाव ह्या कायम स्वरूपी दुष्काळी गावांची जीवनदायीनी असलेली रांजणगाव देशमुख उजनी उपसा जलसिंचन योजना नेहमीप्रमाणे २०१५ पासून माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी बंद पाडली असतांना हि योजना पुन्हा सुरु करण्याबाबत आ. आशुतोष काळे यांनी या जिरायती गावातील नागरीकांना आश्वासित केले होते. त्यावर विश्वास ठेवून या गावातील नागरिकांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आ. आशुतोष काळेंवर विश्वास दाखविला होते. त्यामुळे आपली नैतिक जबाबदारी आ. आशुतोष काळे यांनी इमाने इतबारे पार पाडून सलग पाचही वर्ष पदरमोड करून उजनी चारी योजनेला पुन्हा ऊर्जितावस्थेत आणून अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून हि योजना सलग पाच वर्ष सुरु ठेवण्याची काळे परिवाराची परंपरा जपली आहे. त्यामुळे धोक्यात आलेले आपले राजकीय भवितव्य अजूनच धोक्यात येवू नये यासाठी माजी आ.स्नेहलता कोल्हे यांनी नेहमीप्रमाणे आपल्या हस्तकांकरवी या गावातील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करून योजना बंद पाडल्याचे पाप झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. त्या प्रयत्नाला रांजणगांव देशमुख उजनी उपसा जलसिंचन योजनेचे अध्यक्ष बाबुराव थोरात यांनी मोजक्याच शब्दात पलटवार करून त्याच्या शिडातील हवाच काढून टाकली आहे.
कोल्हे यांना मतदार संघातील जनतेचा किती कळवळा आहे हे माजी आमदार अशोकराव काळे यांच्या प्रयत्नातून कोपरगाव मतदार संघातील कोळपेवाडी येथे मंजूर झालेल्या १३२ के.व्ही.ए.चे सबस्टेशन सिन्नर तालुक्यातील शहा येथे नेण्यासाठी आपली राजकीय ताकत कशी खर्ची घातली आहे मतदार संघातील जनतेने पाहिले आहे. त्यामुळे मा.आ.कोल्हेंना जनतेचा किती कळवळा आहे हे मतदार संघातील जनतेला समजून चुकले आहे व त्यांचे पुतना मावशीचे प्रेम देखील जनता ओळखून बसली आहे. त्यामुळे त्यांची खोटी साक्ष जनतेच्या दरबारात अदखलपात्र असल्याचे अध्यक्ष बाबुराव थोरात यांनी शेवटी म्हटले आहे.