मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे करणार तक्रार
पोहेगांव (प्रतिनिधी) : दारणा गंगापूर धरणात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गोदावरी कालवे वाहत असताना देखील पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून शेतीला पाणी देण्यासाठी हरिसन ब्रँच चारी सुटली जात नसल्याने. यास पाटबंधारे विभागाचे अधिकारी जबाबदार धरून त्यांची तक्रार थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचे शिवसेना शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष भगीरथ होन यांनी सांगितले.
कोपरगाव व राहाता तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या गोदावरी उजवा व डावा कालव्याची परिस्थिती आता फार भयान झाली असून पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. जगाचा पोशिंदा म्हणणाऱ्या शेतकऱ्यावर आता कोणी पाणी देता का, कोणी पाणी देता अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
मिनी कालवा म्हणून ओळख असलेल्या हरिसन ब्रँच चारी लाभ क्षेत्रात पूर्वी डाम डौलाने बागायत उभे होते. तालुक्यातील चांदेकसारे, जेऊर कुंभारी, कोकमठाण, सोनेवाडी डाऊच खुर्द गावातील हजारो एकराचा परिसर पूर्ण बागायती होता. यामुळेच या परिसराला भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी केली कॅलिफोर्निया म्हणून संबोधले होते. आज या परिसराची पूर्ण वाट लागली असून केवळ पाटबंधारे विभाग यासाठी कारणीभूत आहे. वारंवार मागणी करूनही पाटलांच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या समस्या सुटत नसल्याने आता थेट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारींचा पाढा वाचणार असल्याचे शिवसेना जिल्हा शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष भगिरथ होन यांनी सांगितले.
शिर्डी -सिन्नर राष्ट्रीय महामार्ग १६० मध्ये चांदेकसारे परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित झाल्या. यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतात येणाऱ्या चाऱ्या देखील उद्ध्वस्त झाल्या. अनेक वेळा शेतकऱ्यांनी या चाऱ्या संदर्भात आवाज उठवला. मात्र पाटबंधारे विभागाचे अधिकारी या चाऱ्या करून द्यायला देखील असमर्थ ठरले. परिणामी शेतकऱ्यांच्या शेतात पाणी न आल्यामुळे शेती पिके उध्वस्त झाली. ही परिस्थिती जवळजवळ पाच वर्षापासून असल्याने शेतकऱ्यांनी आता करायचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. या परिसरात एक हजाराच्या वर ब्लॉक होते. यामुळे हक्काचे पाणी शेतकऱ्यांना मिळत होते.
आता मात्र हे ब्लॉक देखील रद्द झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. पोहेगांव ते जेऊरकुंभारी हा परिसर पूर्ण अवर्षण प्रवर्षण असल्याने येथे पावसाचे प्रमाण कमी असते. यामुळेच गोदावरी कालव्याला आलेल्या पाण्यावर शेतकरी आपली शेती पिकवतो.
राहता येथील उप अभियंता यांना याबाबत अनेक वेळा फोन करून समक्ष भेट घेऊन या संदर्भात लक्ष घालण्याचे सांगितले. मात्र शेतकऱ्यांवर कुठलीही आस्था अधिकाऱ्यांना उरली नसल्याने आता थेट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे यांच्या तक्रारीचा पाढा वाचून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ. शेतकऱ्यांप्रति साहानुभूतीपूर्वक निर्णय मुख्यमंत्री शिंदे घेतील व हे काम तडीस नेतील असा विश्वास भगीरथ होन यांनी व्यक्त केला.