देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
माणूस नावाची एकच जात आहे. माणुसकी नावाची एकच संस्कृती आहे. त्यालाच मानवता म्हणतात. भारतीय संस्कृतीचं अनन्यसाधारण महत्व आहे. नवीन पिढी पुंडलिक, श्रावणबाळा प्रमाणे तयार व्हावी. यापुढे हेच संस्कार व संस्कृती जपणं आपलं सर्वांचं आद्य कर्तव्य आहे. संस्कार, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल. धर्म टिकला तरच देश टिकेल. असा संदेश अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ दिंडोरीचे गुरुमाऊली परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांनी दिला.
राहुरी येथे मुळा सूतगिरणीच्या प्रांगणात महासत्संग सोहळ्यात राज्यभरातून आलेल्या सेवेकऱ्यांना प्रवचन प्रसंगी गुरुमाऊली मोरे बोलत होते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार अमित खताळ, आमदार विठ्ठलराव लंघे, माजी आमदार चंद्रशेखर कदम, माजी नगराध्यक्ष डॉ. उषा तनपुरे, सुजाता तनपुरे, युवा नेते हर्ष तनपुरे, युवा नेते अक्षय कर्डिले उपस्थित होते.
गुरुमाऊली म्हणाले की, “प्रा. इश्तीयाक अहमद (मूर्तीजापुर, जि. अकोला) यांच्यासारखे सेवेकरी विदर्भामध्ये असंख्य मुसलमान बांधवांना एकत्र आणून भारतीय संस्कृतीचं अनन्यसाधारण पटवून देत आहेत. जाती धर्मात ऐक्याची भावना निर्माण करीत आहेत. वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे. भावी पिढीवर संस्काराची गरज आहे. राज्यात हजारो सेवा केंद्र आहेत. त्यांच्या माध्यमातून विविध समस्या निराकरण, भावी पिढी संस्कारक्षम केले जात आहे. असे सेवा केंद्र प्रत्येक गावात व्हावेत.”