रक्षाबंधनानंतर लाडक्या बहिणींची भाऊबीजही होणार गोड

0

अहमदनगर : राज्यातील महिलांचे सशक्तीकरण व्हावे, त्यांना पुरेशा सोयी – सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीसाठी चालना देणे, त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, महिलांना स्वावलंबी, आत्मनिर्भर बनवणे व महिलांवर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण आहारात सुधारणा करणे या सर्व बाबींचा विचार करून राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. मागील महिन्यात १ कोटीपेक्षा अधिक भगिनींच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे ३ हजार रुपये जमा झाल्यानंतर उशिरा अर्ज सादर करणाऱ्या महिलांच्या खात्यात लवकरच ३ महिन्यांचा लाभ एकत्रित जमा करण्यात येणार आहे.

महिलाचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत. परंतू, दरमहा आर्थिक लाभ देणारी योजना म्हणून तसेच कुटुंबात महिलांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी देखील ही योजना महत्वाची आहे.

योजनेचे स्वरूप : पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर) सक्षम बॅंक खात्यात दरमहा १ हजार ५०० रूपये इतकी रक्कम दिली जाईल. तसेच केंद्र, राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे १ हजार ५०० रूपये पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल.

योजनेचा लाभ बँकेत जमा होण्यासाठी बँक खाते आधार क्रमांकाशी जोडले जाणे गरजेचे आहे. याबाबत महिला व बालविकास विभागातर्फे महिलांना माहिती देण्यात येत आहे. महिलांच्या खात्यात रक्कम जमा करण्याची प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे. सप्टेंबरपर्यंत अर्ज केलेल्या लाभार्थी महिलांना १ जुलै २०२४ पासून दरमहा १ हजार ५०० रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. योजनेसाठी आवश्यक आर्थिक तरतूदही शासनाने केली आहे. त्यामुळे ही योजना महिला सक्षमीकरणासाठी महत्वाची ठरणार आहे.

सिद्धाराम सालीमठ, जिल्हाधिकारी– जिल्ह्यातील प्रत्येक पात्र महिलेला लाभ मिळावा यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. सप्टेंबर महिन्यातही नोंदणी सुरूच राहणार आहे. पात्र महिलांनी आपले बँक खाते आधार क्रमांकाशी जोडून घ्यावे. जिल्ह्यातील पात्र असलेल्या अधिकाधिक महिलांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घ्यावा.

प्रिया सत्रे, लाभार्थी- संसाराचा गाडा ओढत असताना आपल्या इच्छांना अनेकदा मुरड घालावी लागते. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत रक्कम माझ्या बँक खात्यामध्ये जमा केल्याने कौशल्यावर आधारित प्रशिक्षण घेता येईल. त्याचा लाभ कुटुंबालाही होईल.

योजनेच्या लाभार्थी : महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला योजनेच्या लाभासाठी पात्र असतील. २ लाख ५० हजार रुपये पेक्षा उत्पन्न असणाऱ्या महिला लाभासाठी पात्र असतील. २ लाख ५० हजार रुपये उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल मात्र कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड असेल त्यांनी उत्पन्नाच्या दाखला देण्याची आवश्यकता असणार नाही. १५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या ४ पैकी कोणतेही ओळखपत्र अथवा प्रमाणपत्र असल्यास ते ग्राह्य धरण्यात येणार आहेत.

परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. या योजनेचा कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेलादेखील लाभ देण्यात येणार आहे.

आवश्यक कागदपत्रे : योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्जाची प्रत, आधार कार्ड, बँक पासबुक, वयासाठी व रहिवाससाठी – जन्म दाखला/शाळा सोडल्याचा दाखला , पिवळे किंवा केशरी शिधापत्रिकेची सत्यप्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि योजनेच्या अटी व शर्ती पालन करण्याबाबतचे हमीपत्र इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता आहे.

लाभार्थी निवड : ज्या लाभार्थ्यांस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात करण्यात आली आहे. अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल. लाभार्थ्यांने स्वत: वरील ठिकाणी नमूद कागदपत्रांसह उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून लाभार्थ्याचा थेट फोटो काढणे व ई-केवायसी करता येईल. राज्य शासनाने या योजनेंतर्गत सप्टेंबर महिन्यातही अर्ज करण्यास मान्यता दिली आहे. मोबाईल ॲपद्वारे या योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रती लाभार्थी ५० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे.

जिल्ह्यात ११ लाखाहून अधिक लाभार्थी – जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अधिकाधिक पात्र महिलांना योजनेचा लाभ देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अर्ज भरण्यासाठी महिलांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभ लाभला आहे. गावपातळीवरील महिलांचा योजनेत समावेश करण्यासाठी शासकीय यंत्रणेतील प्रत्येक घटकाने ग्रामपातळीपर्यंत योजना पोहोचविण्यासाठी अथक परिश्रम घेतले .

आतापर्यंत ११ लक्ष २२ हजार २०४ महिला भगिणींचे अर्ज पात्र ठरले आहेत. यामध्ये अकोले तालुक्यातून ७४ हजार ६५६ महिलांचे अर्ज पात्र ठरले आहेत. संगमनेर १ लक्ष २७ हजार ७८०, कोपरगाव ७३ हजार ७५५, श्रीरामपूर ७१ हजार ९३८, नेवासा ९१ हजार ५५०, शेवगाव ५८ हजार ८१८, पाथर्डी ६१ हजार ५१९, जामखेड ४० हजार ७८२, कर्जत ५९ हजार २२०, श्रीगोंदा ७६ हजार ४८९, पारनेर ६७ हजार ६९२, अहमदनगर १ लक्ष २० हजार ९६५, राहुरी ८४ हजार १९८ तर राहाता तालुक्यातून १ लक्ष १२ हजार ८४२ महिलांचे अर्ज योजनेच्या लाभासाठी पात्र ठरले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here