कोपरगांव (वार्ताहर)
कोपरगांवची भूमी ही संत-महंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली असुन त्यांची अध्यात्मीक उर्जा येथे येणारी सर्व संकटे परतवून लावत असते, आयुष्यभर शिव नामस्मरणातून या पंचक्रोशीला किर्तन प्रवचनातून अखंड सत्संग विचार देणारे कोपरगांव दत्तपारचे बालब्रम्हचारी अरविंद महाराज (८५) यांचे महानिर्वाणाने कोपरगांववासिय पोरके झाले अशा शब्दांत भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी श्रद्धांजली वाहिली. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली.
सौ. स्नेहलताताई कोल्हे पूढे म्हणाल्या की, कोपरगांव शहरात ज्या ज्या वेळी आपले कार्यक्रम असत त्या त्या वेळी बालब्रम्हचारी अरविंद महाराजांचा दर्शनाचा योग यायचा. कोपरगांव भुमीला गुरु शुक्राचार्य, कचेश्वर ऐतिहासिक पार्श्वभुमी असुन आंतरराष्ट्रीय साईबाबांची शिर्डी देवस्थानामुळे देश विदेशात कोपरगांवचा लौकीक आहे.
बालब्रम्हचारी अरविंद महाराज आणि संजीवनी उद्योग समुह, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे एक अतुट संबंध होता. असंख्य अध्यात्मिक कार्याबरोबरच अनेक विकासात्मक कार्याची सुरुवात त्यांच्या हस्ते झालेली आहे. शिवनामस्मरण व शिवपुराणातून अरविंद महाराजांनी अध्यात्म प्रसार जागविला. राहूरी येथून ते कोपरगांव दत्तपार येथे आले आणि तीच त्यांची अध्यात्म ओळख बनली.
अरविंद महाराजांना अलिकडे अर्धांगवायु झाला होता. लक्ष्मीनगर भागात त्यांचे वास्तव्य होते तेथेही अनेकवेळा त्यांच्याशी वार्तालाप झाला होता.
राष्ट्रसंत जनार्दन स्वामी, जंगलीदास माऊली, ब्रम्हलिन संत रामदासी बाबा, महंत नारायणगिरी महाराज, स्वामी मुकुदानंद सरस्वती, ब्रम्हलिन सागरानंद सरस्वती महाराज, लखनगिरी महाराज, महानुभाव पंथीय राजधरबाबा आदि महतांचा सत्संग सदैव आठवणीत राहणारा आहे. त्यांच्या जाण्याने कोपरगांवकर खऱ्या अर्थाने पोरके झाले आहे. बालब्रम्हचारी अरविंद महाराजांची अध्यात्मीक वाणी आणि त्यांची शिकवण अनंत काळाचा ठेवा असणार आहे, त्यांना हीच शब्दसुमनांची श्रद्धांजली.