संगमनेर : सातत्याने विकास कामे करून संगमनेर तालुक्यातील जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी आपण काम केले आहे.तालुक्यातील जनतेनेही आपल्यावर कायम प्रेम केले असून सत्ता असो वा नसो तरीही तालुक्यातील विकास कामांचा वेग कायम राखला आहे. शहरालगत असलेल्या व नव्याने स्वतंत्र झालेल्या ग्रामपंचायतीमुळे ढोलेवाडीच्या विकासाला आणखी चालना मिळेल असा विश्वास काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
शहरालगत असणाऱ्या ढोलेवाडी येथील ढोले लॉन्स येथे नवीन ग्रामपंचायत स्थापनेचा लोकार्पण सोहळा आमदार बाळासाहेब थोरात, रामायणाचार्य ह.भ.प. रामराव महाराज ढोक, डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे ,सौ दुर्गाताई तांबे यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी ते बोलत होते.या प्रसंगी व्यासपीठावर इंद्रजीत थोरात, आबासाहेब थोरात, बाबा ओहोळ, बाळासाहेब ढोले, सौ शालिनीताई ढोले ,नवनाथ आरगडे, राम हरी कातोरे, अभिजीत ढोले, सुधाकर ताजणे, अमोल गुंजाळ, रामनाथ कु-हे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, गुंजाळवाडी व ढोलेवाडी ग्रामपंचायतीसाठी ३४ कोटी रुपयांच्या निधीतून पाणीपुरवठा योजना आपण राबवली आहे. यातून या दोन्ही गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मोठी सोय होणार आहे. स्थानिक नागरिकांच्या आग्रही मागणीनंतर ढोलेवाडी ही ग्रामपंचायत स्वतंत्र केली आहे. शहरालगत असल्याने ढोलेवाडीच्या विकासाला अधिक चालना मिळणार असून सर्वांनी आता विकासासाठी एकत्रित अधिक जोमाने काम करावे. सत्ता असो वा नसो तालुक्यातील विकास कामांचा वेग आपण कायम राखला आहे. अडचणीचा काळ येत असतो परंतु त्यातून मार्ग काढून आपण पुढे जाणार आहोत. शेवटी विजय सत्याचा होत असतो. गुंजाळवाडी व ढोलेवाडी या परिसरातील नागरिकांनी कायम आपल्यावर मोठे प्रेम केले असून आगामी काळातही सर्वांनी विकास कामांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले. आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, आमदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करताना या गावच्या विकासासाठी आपण कामे केली आहेत. ढोलेवाडी हे शहरालगत असल्याने या परिसराच्या विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. रामायणाचार्य रामराव महाराज ढोक म्हणाले की, मोठ्या गावातून ढोलेवाडी आता वेगळी झाली आहे. नवीन प्रपंच सुरू झाला आहे. एकीने आणि नेटाने विकासाचे काम करा. आमदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका सात्विक विचारांचा असून हीच परंपरा यापुढेही नागरिकांनी जपावी असे त्यांनी सांगितले.यावेळी गुंजाळवाडीच्या सरपंच सौ.वंदना गुंजाळ, अजय फटांगरे, सुभाष सांगळे, भाऊ डाके, अरुण ताजणे, गणपतराव सांगळे, रोहिदास पवार, सुहास आहेर, संतोष हासे, भास्कर गुंजाळ, बाबुराव गुंजाळ, आदी सह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे संचालक अभिजीत ढोले यांनी केले. सूत्रसंचालन दिलीप पवार, शरद बटवाल व पोपट आगलावे यांनी तर सुधाकर ताजने यांनी आभार मानले.