आ. आशुतोष काळेंच्या मध्यस्तीमुळे वाकडी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन मागे

0

कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघातील वाकडी ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे मागील पंधरा महिन्यापासून वेतन थकल्यामुळे या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले होते. त्यामुळे ग्रामस्थांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. त्याबाबत तातडीने तोडगा काढणे गरजेचे होते. त्याबाबत आण्णासाहेब कोते यांनी आ.आशुतोष काळे यांच्या निदर्शनास हि बाब आणून दिली. त्यावेळी कर्मचाऱ्यांचे  काम बंद आंदोलन देखील योग्य होते व दुसरीकडे नागरिकांची देखील अडचण झाली होती. यावर आ.आशुतोष काळे यांनी वेळीच योग्य तोडगा काढल्यामुळे कर्मचाऱ्यांना पाच महिन्याचे वेतन मिळणार असून त्यांनी आपले आंदोलन मागे घेत आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव मतदार संघातील वाकडी ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे मागील पंधरा महिन्यांचे वेतन थकले होते. सदर वेतन मागणीसाठी ग्रामपंचायत कर्मचारी यांनी अनेक वेळा ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसेवक यांच्याकडे वेतन मिळावे यासाठी मागणी केली होती. परंतु त्यांची मागणी पूर्ण होत नव्हती. काम करूनही वेतन मिळत नसतांना कुटुंबाच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला असल्यामुळे अखेर या कर्मचाऱ्यांनी लोकशाहीच्या मार्गाने काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले होते. या आंदोलनामुळे जवळपास सोळा हजार लोकसंख्या असलेल्या गावच्या पाणी पुरवठ्यासह, स्वच्छतेचे प्रश्न तसेच कार्यालयीन कामकाजावर देखील मोठा परिणाम होवून पर्यायाने नागरिकांच्या अडचणी वाढल्या होत्या.

            त्याबाबत शनिवार (दि.०७) रोजी ग्रामपंचायत कार्यालयात सर्वपक्षीय पदाधिकारी यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत घर पट्टी, पाणी पट्टी, जागा/गाळा भाडे, पोल्ट्रीचा कर वसूल झाल्याशिवाय वेतन अदा करणे अशक्य असल्याचे सांगण्यात आले. सर्व कर्मचारी यांनी वसूली साठी जबाबदारीने प्रयत्न करावे. कर्मचारी यांची अर्थिक परिस्थिती अडचणीची असल्याने कर वसुलीची रक्कम जमा होईपर्यंत गावातील पदाधिकारी/लोकप्रतिनिधी यांनी अनामत रक्कम ग्रामपंचायत कडे जमा करुन कर्मचारी यांचे वेतन अदा करणेसाठी सहकार्य करावे. ग्रामपंचायतीची कर वसूली झाल्यांनतर सदर अनामत रक्कम त्या व्यक्तीना परत करावी अशी चर्चा या बैठकीत झाली होती.              

 

त्याबाबत आ. आशुतोष काळे यांनी आण्णासाहेब कोते यांना कर्मचाऱ्यांचे वेतन तातडीने व्हावे यासाठी पुढाकार घेण्यास सांगून तीन लक्ष रुपयांची रक्कम अनामत म्हणून वाकडी ग्रामपंचायतीस देण्यास सांगितले. त्या सूचनेनुसार आण्णासाहेब कोते यांनी तीन लक्ष रुपयांचा धनादेश ग्रामविकास अधिकारी संतोष सोनवणे यांच्याकडे सुपूर्द केला.त्यामुळे कर्मचाऱ्यांना पाच महिन्याचे वेतन मिळनार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपले काम बंद आंदोलन मागे घेतले असून गावातील पाणी पुरवठा व कार्यालयीन कामकाज सुरळीत झाले व ग्रामस्थांची पाण्याची गैरसोय देखील दुर झाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांबरोबरच वाकडी ग्रामस्थांनी देखील आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here