जामखेड/चौंडी : जामखेड तालुक्यातील चौंडी येथे सुरू असलेल्या उपोषणाकडे दुर्लक्ष, तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी चौंडीचा दौरा रद्द केल्याच्या निषेधार्थ संतप्त धनगर समाजबांधवांनी काल (शुक्रवारी) नगर-सोलापूर महामार्गावरील चापडगाव येथे राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.
या वेळी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच वटहुकूम निघाला नाही, तर महाराष्ट्रभर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा धनगर बांधवांनी दिला.
धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा, या मागणीसाठी यशवंत सेनेच्या वतीने चौंडी येथे दहा दिवसांपासून उपोषण सुरू करण्यात आले. मात्र राज्य सरकारने अद्याप या उपोषणाबाबत दखल घेतली नाही. तसेच दहा दिवस होऊनही पालकमंत्री या ठिकाणी फिरकले नाहीत. त्यामुळे धनगर समाजातील युवकांनी आक्रमक पवित्रा घेतला. यानंतर नगर-सोलापूर महामार्गावरील चापडगाव येथे राज्य सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध केला. या वेळी राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा काल (शुक्रवारी) चौंडी येथील धनगर समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या आंदोलकांना भेटण्यासाठी दौरा आयोजित करण्यात आला होता. मात्र, सकाळी ऐन वेळी हा दौरा रद्द झाला. त्यातच उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत चालली आहे.