धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम (स्वाधार) योजना

0

सातारा दि. 7 :  शासकीय वसतिगृहामध्ये  प्रवेश न मिळालेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी  पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी निकष खालीलप्रमाणे आहेत.

            विद्यार्थी धनगर समाजातील असावा. विद्यार्थ्याने अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहिल.  विद्यार्थ्याच्या पालकाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे तसेच केंद्र शासनामार्फत ज्या-ज्या वेळी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी उत्पन मर्यादेत वाढ होईल त्यानुसार या योजनेसाठी पालकाची उत्पन्न वार्षिक मर्यादा त्या-त्या प्रमाणे लागू राहील.  विद्यार्थ्याने स्वत:चा आधार क्रमांक आपले राष्ट्रीयकृत बँक खात्याशी संलग्न करणे बंधनकारक राहील. विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या ठिकाणी आहे, अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवाशी नसावा.  विद्यार्थी इयत्ता 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा.  इयत्ता 12 वी मध्ये किमान 60 टक्के गुण मिळालेले विद्यार्थी पात्र राहतील.  दोन वर्षापेक्षा कमी कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ मिळणार नाही.  पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा इतर शाखेच्या अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही.  अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, वैद्यकिय परिषद, भारतीय फार्मसी परिषद, वस्तुकला परिषद, राज्य शासन किंवा तत्सम संस्था इत्यादी मान्यता प्राप्त महाविद्यालय / संस्थेमध्ये मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यास प्रवेश मिळालेला असावा.  इयत्ता 12 वी नंतरच्या तंत्रशिक्षण तसेच व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रीभूत (कॅप) प्रवेश प्रकियेद्वारे प्रवेश घेतलेला असावा.  विद्यार्थ्याची महाविद्यालयीन उपस्थिती 60 टक्के असणे बंधनकारक राहील.  विद्यार्थ्याची निवड गुणवत्तेनुसार करण्यात येईल.  विद्यार्थी अभ्यासक्रम पुर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील. तसेच प्रत्येक वर्षी त्या त्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.  एका विद्यार्थ्यास जास्तीत जास्त 5 वर्ष या योजनेचा लाभ घेता येईल.  विद्यार्थ्याचे कमाल वय 28 वर्षापेक्षा जास्त नसावे.  विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा.  विद्यार्थ्यास आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग किंवा संबधित शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसावा.  धनगर समाजातील अपंग विद्यार्थ्यांना सदर योजनेचा लाभ प्राथम्याने देय राहील.  धनगर समाजातील विद्यार्थी जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेशित असावा.

           अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सर्व्हे नं. 22अ, जुनी एम. आय. डी. सी. रोड, बॉम्बे रेस्टॉरंट उड्डाणपुल, सातारा, दुरध्वनी क्रमांक 02162-298106 या कार्यालयास संपर्क करावा, असे अवाहन  सहायक आयुक्त, समाज कल्याण नितीन उबाळे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here