कोपरगांव प्रतिनिधी :
संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक, सहकारमहर्षी, शेती, सहकार, सिंचन, बँक, उद्योग, सामाजिक, राजकीय चळवळीचे अभ्यासक माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या पुण्यतिथी ते जयंती सप्ताह तृतीय पुण्यस्मरणानिमीत्त शहरातील संत ज्ञानेश्वरनगर तहसिल कार्यालय मैदानावर दररोज सायंकाळी ७ ते १० या वेळेत संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली व युवानेते कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या नेतृत्त्वाखाली स्त्रि शक्तीच्या प्रमुख, वारकरी अध्यात्मीक क्षेत्रातील साध्वी, संगीत विशारद ह.भ.प. साध्वी सोनालीदिदी कर्पे यांच्या रसाळ वाणीतुन सालाबादप्रमाणे याही वर्षी रामकथेचे आयोजन करण्यांत आले असुन या कार्यक्रमास सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सहकारमहर्षी शंकररावजी कोल्हे विचारधारा ट्रस्टचे मच्छिंद्र पा. टेके यांनी केले.
तालुक्यातील शिंगणापुर येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर सोमवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यांत आले होते त्यात माजी सभापती मच्छिंद्र टेके बोलत होते. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या पुण्यतिथी ते जयंती उपक्रमाचे गेल्या दोन वर्षापासुन आयोजन केले जात असुन यंदाचे हे तिसरे वर्ष आहे.

प्रारंभी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे उपस्थितांच्या हस्ते पुजन करण्यांत आले. कोपरगांव तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीचे उपाध्यक्ष केशव भवर यांनी प्रास्तविक केले आणि अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान यांनी आभार मानून कार्यक्रमाची दैनंदिन रूपरेषा सांगितली.
माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे चौफेर ज्ञान होते, त्यांनी या भागाचा तसेच कोपरगांव शहर व तालुक्याचा चेहरामोहरा बदलण्यासाठी जाणिवपुर्वक प्रयत्न करत विविध उपक्रम सुरू करून ते तडीस नेले. त्यांची दुसरी आणि तिसरी पिढी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या कार्याचा वारसा पुढे चालवत आहे.
साध्वी सोनालीदिली कर्पे यांच्या रसाळवाणीतुन रामजन्म (१७ मार्च), रामविवाह (१८ मार्च), राम वनवास (१९ मार्च), भरतभेट (२० मार्च), शबरी भेट (२१ मार्च), राम राज्याभिषेक (२२ मार्च), हे रामकथेतील प्रसंगानुरूप हुबेहुबे पात्रे साकारून रामकथा सांगितली जाणार असुन २३ मार्च रोजी त्यांचे काल्याचे किर्तन होवुन महाप्रसाद वाटप करण्यांत येणार आहे तरी भाविकांनी मोठया सख्येने या कार्यक्रमांस उपस्थित रहावे असे आवाहन विचारधारा ट्रस्टच्यावतीने करण्यांत आले आहे.यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी,संचालक,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
