कोपरगाव : राज्यातील बहुतांश शिक्षण संस्था या मराठा समाजातील व्यक्तींच्या ताब्यात आहेत. त्यामुळे मराठा मिळेल तेव्हा मिळेल. मात्र सध्या तरी शिक्षणसम्राटांनी डोनेशन न घेता मराठा विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा अशी मागणी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केली आहे.
आपल्या पत्रकात वहाडणे पुढे म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आंदोलने सुरू आहेत.वर्षानुवर्षे मागणी करूनही मराठा समाज आरक्षणापासून वंचित आहे.शेतकरी वर्गाची तर फारच दुरवस्था झालेली आहे.यावर्षी पावसाने दडी मारल्याने भिषण दुष्काळाला सामोरे जावे लागणार आहे.आरक्षण नसल्याने मराठा समाजाच्या मुला-मुलींना शिक्षण घेतांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते.लाखो रुपये डोनेशन भरण्यासाठी जमिनी विकून,कर्जबाजारी होऊन शिक्षण घ्यावे लागते.आरक्षण नसल्याने पात्रता असूनही-शिक्षण घेऊनही नोकरीसाठी वणवण फिरावे लागते.
मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील सर्वच पक्षांच्या मराठा शिक्षण सम्राटांनी मराठा समाजाच्या मुला-मुलींसाठी आपापल्या शिक्षण संस्थामध्ये डोनेशन न घेता प्रवेश देण्याचा निर्णय घेतला पाहिजे. बहुतांश मराठा शेतकऱ्यांच्या घामावरच या शिक्षण संस्था उभ्या राहिलेल्या आहेत.मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत प्राधान्य दिल्यास मराठा समाजाला मोठाच दिलासा मिळू शकतो.यामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्याही काही प्रमाणात कमी होऊ शकतात.सध्या सर्वच राजकीय पक्षांना मराठा समाजाचा फारच पुळका आलेला आपण पहातोय.
नेत्यांनी एकमेकांवर दोषारोप करून किळसवाणे राजकारण करण्यापेक्षा मराठा समाजाच्या युवक-युवतींना दिलासा द्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.