कोळपेवाडी वार्ताहर :- मतदार संघातील जनतेने दिलेल्या संधीचे सोने करून मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करून मतदार संघाचे रस्ते, पाणी, वीज आदी मुलभूत प्रश्न बहुतांशी सोडविले आहेत परंतु अजूनही काही प्रश्न सोडवायचे आहेत. मतदार संघाच्या विकासासाठी माझे प्रयत्न यापुढेही असेच राहतील आपले आशीर्वाद असेच पाठीशी ठेवा मतदार संघाच्या विकासाचे प्रश्न शिल्लक राहणार नाही अशी ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींना आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रजीमा ४ चे ब्राम्हणगाव-टाकळी-कोपरगाव-कोकमठाण-सडे-शिंगवे या रस्त्याच्या ४ कोटी निधीतून करण्यात येणाऱ्या कामाचे भूमिपूजन, २.५० कोटी निधीतून पुणतांबा रोड (रा.मा.३६) ते कारवाडी (प्रजीमा ९१) मध्ये सुधारणा करणे व मोजे तीन चारी (कोकमठाण) येथे ११ के.व्ही.भन्साळी फिडर एच.टी लाईन स्थलांतरित करणे आदी कामाचा शुभारंभ आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आला तसेच दिव्यागांना निधीचे वाटप करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, कोपरगाव मतदार संघाला काळे परिवाराने आपले कुटुंब मानले असून मतदार संघातील सर्व नागरिक आमच्या परीवाराचे सदस्य आहेत. त्यामुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांना सुखी ठेवण्यासाठी काळे परिवाराने नेहमीच प्रयत्न केले आहे. काळे परिवाराचा हाच वारसा पुढे चालवितांना मागील पाच वर्षात विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. विकासाचा अनुशेष भरून काढतांना जास्तीत जास्त निधी मतदार संघासाठी कसा आणता येईल यासाठी प्रयत्न करून मतदार संघातील काही दशकापासून प्रलंबित असणारे विकास कामे पूर्ण केली असून कोकमठाण देखील अपवाद नाही. ह.भ.प.सद्गुरू गंगागिरिजी महाराज यांच्या १७५ व्या अखंड हरीनाम सप्ताहाच्या वेळी येणाऱ्या लाखो भाविकांना रस्त्याची अडचण जाणवू नये यासाठी कोकमठाण गावातील बहुतांश रस्त्यांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी देवून रस्ते चकाचक केले व पुन्हा चार कोटीच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करीत आहोत. कोकमठाण व परिसराचा विजेचा प्रश्न सोडविला. ५५कोटीच्या पाणी योजनेचा प्रस्ताव शासन दरबारी दाखल केला असून त्याला मंजुरी मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कोकमठाणच नाही तर मतदार संघातील प्रत्येक गावात एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत. त्यामुळे पाच वर्ष विरोधकांकडे बोलायला काहीच नव्हते मात्र येणारी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ते जरी आरोप करीत असले तरी हि लोकशाही आहे. लोकशाहीत विरोधकांना आरोप करावे लागतात त्यामुळे विरोधकांच्या आरोपांकडे लक्ष देवू नका आपल्याला अजून विकासाचा मोठा पल्ला गाठायचा आहे असे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व सलग्न संस्थांचे पदाधिकारी, कोकमठाण ग्रामपंचायतीच्या सरपंच,उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.