भारत देश ही जगातील महत्वपूर्ण बाजारपेठ आहे,हे विविध आकडेवारीतून सिद्ध झालेले आहे.देशांतर्गत वस्तू खरेदी-विक्रीत अब्जावधींची उलाढाल होते.हया खरेदी विक्रीच्या केंद्रस्थानी असतो तो ग्राहक.ग्राहकाला नुसतेच सन्मानाचा दर्जा देवून आजवर त्याची अति प्रचंड लूट करण्यात आली आहे.देशात आजवर करोडो ग्राहकांची लूट करण्यात आली आणि ती आजही बिनबोभाट सुरूच आहे.ही लूट केली जाते ती उत्पादकां कडून आकारल्या गेलेल्या अवाजवी विक्री किंमतीच्या रूपाने.सोप्या भाषेत सांगायचे तर,एखादी वस्तू तयार करण्यासाठी कोणत्याही उत्पादकाला जो खर्च येतो ते त्या वस्तूची उत्पादन मूल्य(Production Value) असते.उत्पादकाकडून अपेक्षा असते की मधल्या सर्व साखळ्या आणि सर्व कर निर्धारण कडून त्याने ग्राहका कडून योग्य नफ्याच्या मोबदल्यात ती वस्तू विकावी.पण योग्य नफ्यात विकण्या ऐवजी ती वस्तू अमर्याद नफा घेवून विकली जाते.उत्पादन किंमती पेक्षा विक्री किंमत कितीतरी पटीने अधिक असते.आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या व्यवहारावर सरकारचे कोणतेही नियंत्रण नसते.उदाहरण घ्यायचे झाल्यास,समजा एखाद्या वस्तूला तयार करण्यासाठी उत्पादकाला १०/- रुपये खर्च आला.
यात खर्चात त्याचा कच्चा माल,मजुरी,वीज,प्रक्रिया,संपूर्ण गुंतवणूक या साऱ्या बाबी समाविष्ट आल्या.आता ग्राहका पर्यंत पोहचविण्यासाठी वाहतूक खर्च,विविध कर,स्टॉकिस्ट, डिस्ट्रिब्यूटर,डीलरचे कमिशन असे सर्व मिळून ३ ते ४ रुपये होत असेल व एकंदर सर्व व्यवहारावर त्याला २० ते ३० % नफा मिळवायचा असेल तर त्या वस्तूची ग्राहकाला पडणारी विक्री किंमत १७ ते १८ रुपये असायला हवी.परंतु १७ ते १८ रुपये उत्पादन मूल्य व खर्च येणारी वस्तू ग्राहकाला ५० ते ६० रुपये किंवा त्यापेक्षाही जास्त रुपयात विकली जात असेल तर ही ग्राहकांची कितीतरी पटीने लूट आहे.उत्पादन किंमत,येणारा खर्च व विक्री किंमत यातील प्रचंड तफावत ही अनियंत्रित आहे.खाद्य पदार्थ विक्रीत ही तफावत जास्त नाही.पण फार्मास्युटिकल क्षेत्रात ७० पैशात तयार होणारी एक गोळी ही प्रति गोळी ३० ते ४० रुपयात विकली जाते.२०० रुपयात तयार होणारी इलेक्ट्रॉनिक वस्तू १४०० ते १६०० रुपयात विकली जाते.कपडे,स्टेशनरी वस्तू,सौंदर्य प्रसाधने,दैनंदिन आवश्यक वस्तू यातील उत्पादक मूल्य व विक्री मूल्य यातील तफावत गरीबा पासून श्रीमंत सर्वांची आर्थिक लूट करणारी आहे.
ग्राहक हिताचे कायदे फक्त कागदावरच आहेत.अब्जावधीं रुपयांच्या या दररोजच्या बाजार व्यवहारावर ग्राहक हिताचे कोणतेच नियंत्रण नाही.या बाबतीत कोणतीच जनजागृती नाही.आजवरच्या कोणत्याच सरकारने मूल्य निर्धारणांची कोणतीच प्रणाली राबविली नाही.आतातरी या सर्व प्रक्रिये साठी,सर्व बाजारपेठेसाठी सक्षम अशी नियंत्रण प्रणाली निर्माण करून या अमर्याद नफेखोरीवर चाप लावणे गरजेचे आहे.यासाठी सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे.ही अवाजवी नफेखोरी रोखली तर महागाईही नियंत्रणात येवून खऱ्या अर्थाने ग्राहक हित साधल्या जाईल.
उज्वलकुमार म्हस्के भारतीय 9284530492.