गुहागरमध्ये एकाच सरणावर मुलगी-जावई आणि दोन नातवांना मुखाग्नी दिल्याची हृदयद्रावक घटना

0

गुहागर : कोकणात गुहागर तालुक्यातल्या हेदवी येथे आजीच्या वर्षश्राध्दाला येत असताना मुंबई गोवा महामार्गावर झालेल्या अपघातात एक अख्खं कुटुंब संपलं.

रायगड जिल्ह्यातील गोरेगाव रोपोली येथे झालेल्या या अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला होता. यात पंडित कुटुंबातील पती-पत्नी आणि दोन लहानग्यांचा समावेश होता. या चौघांनाही एकाच सरणावरती अग्नी देण्याची वेळ हेदवी येथील रघुनाथ सखाराम जाधव यांच्या कुटुंबावर आली.

या अपघातात रघुनाथ जाधव यांची मुलगी, जावई आणि दोन लहानग्या नातवांना अग्नी देण्याची वेळ रघुनाथ जाधव यांच्यावर आली. तर, एका सरणावर त्यांना त्यांच्या मुलाला अग्नी द्यावा लागला. शेवंती सखाराम जाधव या 103 वर्षांच्या आजी यांचा गेल्यावर्षी मृत्यू झाला होता, त्या आजीच्या वर्षश्राद्धला सगळे येत होते.

शुक्रवारी (20 जानेवारी) पहाटे पाच वाजता झालेल्या अपघातात या पाच जणांना मृत्यूने गाठले. यामध्ये नीलेश पंडित (वय 45), त्यांची पत्नी नंदिनी (वय 35), मुलगी मुद्रा (वय 12) आणि मुलगा भव्य (वय 4) यांचा मृत्यू झाला होता. नीलेश पंडित हे हेदवी गावचे जावई असून, भादगाव जवळ डावखोल (तालुका गुहागर) हे त्यांचे मूळ गाव आहे.

गावात घरचे कोणी नसल्याने त्यांच्यावरही हेदवी येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here