कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरदवाड (ता. शिरोळ) येथे कृषिभूषण फौंडेशन ऊस रोपवाटिकेस भारत सरकारच्या केंद्रीय कृषी मंत्रालय समिती आणि केंद्रीय ऊस विकास विभागाच्या केंद्रीय पथकाने भेट देऊन पाहणी केली. राष्ट्रीय पातळीवरील कोईम्बतूर (तामिळनाडू) येथील भारतीय कृषी अनुसंधान केंद्र ऊस संशोधन संस्थामधून पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच टिश्यू कल्चर ब्रिडर सीडसपासून तयार केलेल्या ऊस रोपांची निर्मिती येथे केली आहे. त्यामुळे येथे पथकाने भेट दिली.
कृषिभूषण फौंडेशन ऊस रोपवाटिकेचे प्रमुख एल. डी. कुंभार यांनी ऊस रोपवाटीकेत हा प्रयोग यशस्वी केला आहे. यावेळी केंद्रीय पथकाचे प्रमुख विरेंद्र सिंग यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ होईल, असे सांगून रोपवाटीकेचे प्रमुख श्री. कुंभार यांच्या कामाचे कौतुक केले.
ऊस उत्पादनात घट होण्यामागील प्रमुख कारणांपैकी सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे रोगाला बळी पडत असलेले तेच तेच जीर्ण झालेल्या पारंपारिक बियाणे. शेतकऱ्यांनी ऊस उत्पादन वाढीसाठी दर तीन वर्षांनी बियाणे बदलणे आवश्यक असल्याचे मत श्री. कुंभार यांनी व्यक्त केले.
टिश्यू कल्चर ब्रिडर सीडसपासून ऊस रोपांच्या निर्मितीचा अनुभव सांगितला. प्रगतीशील शेतकरी वसंत कुरुंदवाडे, शेखर कुंभार, राजेश पाटील (मड्डे) यांच्या शेतातील बियाणे प्लॉटची पाहणी करून मार्गदर्शन केले. जिल्हा कृषी अधिक्षक अजय कुलकर्णी, उपविभागीय कृषी अधिकारी जयश्री हावळे, कृषी पर्यवेक्षक कमाल बाणदार, कृषी सहायक सुवर्णा कोळी, सचिन कुंभार, मोहन परीट, बाळू कुंभार, विनायक परीट, राहूल कुंभार आदी उपस्थित होते.