मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा परदेशी कुटुंबियांचा इशारा 

0

प्रशासनाकडून गुरवार दिनांक २० मार्च पर्यंत मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन 

उरण दि १७(विठ्ठल ममताबादे )शेवा कोळीवाडा (जुना शेवा कोळीवाडा )चे प्रकल्पग्रस्त,शेतकरी आणि दुग्ध व्यवसाय असे पारंपरिक व्यवसाय असणारे परदेशी कुटुंबियांचे पुनर्वसन उरण बोरी पाखाडी सरकारी खाजण स्मशान भूमी जवळ करण्यात आले. बोरी पाखाडी स्मशान भूमी जवळ परदेशी कुटुंब गेली ४० वर्ष  वास्तव्यास आहे. मात्र पुनर्वसित असून देखील परदेशी कुटुंबियांना शासनाच्या पुनर्वसन कायदे अंतर्गत हव्या तशा १३ नागरी सेवा सवलती शासनाकडुन उपलब्ध झालेल्या नाहीत. त्यातच परदेशी कुटुंबियांना दररोज पिण्याचे पाणी मिळत नसल्याने या परिसरात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे.

गेली ३ महिने पिण्याचे पाणी मिळत नसल्याने तसेच या संदर्भात शासनाच्या सर्वच विभागात अनेक महिने पत्रव्यवहार करून देखील न्याय न मिळाल्याने परदेशी कुटुंबियांनी अखेर आमरण उपोषणाचे हत्यार उपसले. कायदेशीर व शांततेच्या मार्गाने पत्रव्यवहार करून देखील न्याय मिळत नसल्याने परदेशी कुटुंबीयांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. पाणी कनेक्शन कट करून परदेशी कुटुंबियांना मानसिक व शारीरिक त्रास देणाऱ्या पाणी कमिटीला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकून ती समिती बरखास्त करावी. न्यायालयाचे आदेश परदेशी कुटुंबीय यांच्या बाजूने असताना संपूर्ण परदेशी कुटुंबियांना जेएनपीटीने टाकून दिलेल्या ग्रामपंचायतीच्या लाईन वरून पाणी मिळावे. आणि हे पाणी दररोज मिळावे. पाणी न सोडणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी. या घटनेस जे जे दोषी आहेत त्यांची सखोल चौकशी करून संबंधितांवर उचित कारवाई करावी. या प्रमुख मागणीसाठी दिनांक १७/३/२०२५ रोजी सकाळी १० वाजल्यापासून परदेशी कुटुंबिय पंचायत समिती कार्यालय उरणच्या आवारात आमरण उपोषणाला बसले होते. या उपोषणाला विविध शासकीय कर्मचारी, अधिकारी संघटनेने, विविध सामाजिक संस्था, उरण मेडिकल असोसिएशन इत्यादी संघटनानी जाहिर पाठिंबा दिला.शिवसेना शिंदे गटाचे रायगड जिल्हा प्रमुख अतुलशेठ भगत, तालुका प्रमुख दिपक ठाकूर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा गट)चे उरण विधानसभा अध्यक्ष वैजनाथ ठाकूर, शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते महादेव बंडा, महिला तालूका अध्यक्ष सीमा घरत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट )चे रायगड उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर, भारतीय जनता पार्टीचे उरण तालुका उपाध्यक्ष पंडित घरत,शिवसेना शाखा प्रमुख कमळाकर कोळी माजी सरपंच हनुमान कोळीवाडा गौरव कोळी आदी राजकीय नेत्यांनी प्रत्यक्ष भेटून जाहीर पाठिंबा दिला.

या सर्वच राजकीय पदाधिकाऱ्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना धारेवर धरले. पाणी हे अत्यावश्यक सेवा आहे. ते थांबविता येत नाही. प्रत्येकाला पाणी मिळाले पाहिजे. ती मूलभूत गरज आहे असे सांगत सर्वच राजकीय पदाधिकाऱ्यांनी परदेशी कुटुंबियांना पाणी मिळवून देण्यासाठी शासकीय स्तरावर जोरदार प्रयत्न केला.वाढता तीव्र विरोध लक्षात घेता व परदेशी कुटुंबियांची रास्त मागणी लक्षात घेता प्रशासनाने वेगाने सूत्र हलविली. पोलीस प्रशासन व पंचायत समिती प्रशासन व सर्वपक्षीय पदाधिकारी यांच्यात संयुक्त बैठक झाली.त्यात प्रशासनातर्फे परदेशी कुटुंबियांना न्याय देण्याचे आश्वासन देण्यात आले. उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी तथा प्रशासक विनोद मिंडे, ग्रामपंचायत अधिकारी विनोद मोरे यांनी मध्यस्थी करत हा प्रश्न गुरवार दिनांक २० मार्च २०२५ पर्यंत सोडविण्याचे आश्वासन दिले. आम्हाला २० तारखे पर्यंत वेळ दया आम्ही हा प्रश्न सोडवू असे शासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

शासकीय अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्याने परदेशी कुटुंबियांनी सुरु केलेले आमरण उपोषण तात्पुरते स्थगित केले.आमरण उपोषणास बसलेले ८९ वर्षाचे जेष्ठ नागरिक तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू संतोष परदेशी यांचे वडील अनंत परदेशी यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांनी नारळपाणी पाजले. नारळ पाणी पिऊन अनंत परदेशी आणि त्यांच्या कुटुंबियांनी सदर आमरण उपोषण तात्पुरते स्थगित करीत असल्याचे जाहीर केले. मात्र २० मार्च २०२५ पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अनंत परदेशी (वय ८९) व उपोषणाला बसलेले कृपेश अनंत परदेशी, नवनीत रामकिसन परदेशी,कुमारी जयश्री रामकिसन परदेशी,आरती नवनित परदेशी,डॉक्टर दया महेश परदेशी, पल्लवी संतोष परदेशी,रिना हर्षल परदेशी यांनी दिला आहे. आता प्रशासन परदेशी कुटुंबियांना न्याय देते की पुन्हा टाळाटाळ करत वेळ मारून नेते हे पाहणे महत्वाचे ठरेल. प्रशासनाच्या भूमिकेकडे आता परदेशी कुटुंबियांसह इतर नागरिकांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here