अमोल बनसोडे नाशिक ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या धर्मांतर घोषणेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर काल येवला मुक्तीभूमी येथे माजी खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ यांनी येथील सोहळ्याच्या नियोजनाची पाहणी करण्यासाठी मुक्तीभूमी येथे भेट दिली. यावेळी भुजबळ यांनी मुक्तीभूमीवर पायातील चप्पल घालूनच भेट दिल्यानचे समोर आले आहे . भुजबळ यांच्या या असंवेदनशील वागण्याचा आंबेडकरी जनतेमधून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
समीर भुजबळ यांचे या भेटीदरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. यामध्ये समीर भुजबळ मुक्तीभूमी विहाराच्या पायऱ्या उतरताना दिसत आहेत. बाकी सर्व सोबत असलेले सहकारी हे पायातील चपला बुटे काढलेले दिसत आहेत. मात्र केवळ समीर भुजबळ यांच्या पायात चपला तशाच आहेत, मुक्तीभूमीच्या पायऱ्यांवर चढण्यापूर्वीच खाली चपलाबुटे (पादत्राणे)काढण्याची सूचना देणारा फलक लावलेला आहे . कदाचित तो समीर भुजबळ यांना दिसला नसेल असे म्हणू मात्र आपण ज्या ठिकाणी जात आहोत ते ठिकाण हे संपूर्ण मानव जातीला विश्वशांतीचा मार्ग दाखवणाऱ्या विज्ञानवादी धम्माचे संस्थापक तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे विहार आहे. एवढेच नव्हे तर हे स्मारक उभे राहण्यामागे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक क्रांती लढ्याची मोठी पार्श्वभूमी देखील आहे . त्यामुळेच हे ठिकाण संपूर्ण पुरोगामी विचारांच्या लोकांसाठी प्रेरणास्त्रोत तर नवबौद्ध -आंबेडकरी समाजासाठी अस्मितेचा विषय आहे.
जो कुणी अभिवादक शुद्ध भावाने याठिकाणी येतो. तो स्वयं प्रेरणेने या ऐतिहासिक भुमिचे पावित्र्य जपतो मात्र केवळ त्या त्या परिस्थितीत राजकीय फायदा मिळणारी भूमिका ठेवून अशा पद्धतीचे स्टंट करण्यात भुजबळ घराणे किती तरबेज आहे. हे 80 च्या दशकात रिडल्स प्रकरणावरून हुतात्मा स्मारकाचे शुद्धीकरण करणाऱ्या मंत्री छगनराव भुजबळ (समीर भुजबळ यांचे काका )यांच्या कृतीतूनही आंबेडकरी समाजाने अनुभवले आहे . सोबतच राजकीय स्थितीनुसार कधी उजवी तर कधी डावी विचारधारा स्वीकारणारे भुजबळ कुटुंबीयांचे सध्याचे पुरोगामी विचार किती बेगडी आहे हेही नाशिक येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाच्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मूळ पद्यरूपी सामाजिक संदेशात बदल करून लिहीण्यात आला, (हे चुकून होणे शक्य नाही) हे सर्व केवळ राजकीय नफा तोटा डोळ्यासमोर ठेवून घडवण्यात येते हे यावरूनही सिद्ध होते.
याचमुळे तर अशा अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींतून भुजबळ कुटुंबीय आपण किती श्रेष्ठ आहोत हे दाखवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. मुक्तीभूमी कडे जाणाऱ्या पीडब्ल्यूडीच्या मोठ्या कमानीवर तर मंत्री छगनराव भुजबळांनी स्वतःचा फोटो हा हट्टाने बाबासाहेबांच्या बरोबरीने लावला याला चूक म्हणावे की सत्तेचा माज ? जर हे चुकून झालेलं असेल तर आंबेडकरी अनुयायांच्या भावना दुखावल्या गेल्या आहे लक्षात घेऊन जाहीर माफी मागून चूक दुरुस्त व्हावी . अशी तिव्र प्रतिकीया समाजातुन उमटत आहे .