पैठण,दिं.२१.(प्रतिनिधी):श्री एकनाथ महाराजांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी समाधीवर चैत्र व वैशाख या महिन्यातील प्रति शुद्ध व वद्य दशमीस परंपरेने चंदनाचा लेप लावल्या जातो. चंदनाचे धार्मिक क्षेत्रात खूप महत्त्व आहे, चंदन थंड असल्याने उष्णवरोधी म्हणुनही त्याकडे पाहिले जाते.
आपण जशी आपल्या देहाची काळजी करतो तशीच आपण देवाची काळजी करुन विधिवत उपचार करणे यालाच पूजा असे म्हटले जाते. अशी ऊटी पूजा पंढरपुर व आळंदीला देखिल करण्यात येते. वसंत ऋतुच्या आगमनाप्रीत्यर्थ याचा प्रारंभ असल्याने यास वसंतपूजा देखील म्हणण्यात येते.
त्यानुसार वैशाख वद्य दशमी, शनिवार दिनांक १८ मे २०२४ रोजी संध्याकाळी ठीक ७:३० वाजता ब्रह्मवृंदांच्या शांतीपाठ मंत्र घोषात ही पूजा संपन्न करण्यात आली.
नाथवंशज हभप श्री योगिराजमहाराज गोसावी, पैठणकर यांनी ऊटीसाठी लागणारे चंदन उगाळून नाथ समाधीची विधीवत पूजा केली. समाधीस परंपरेप्रमाणे विड्याच्या पानांची आरास करण्यात आली तर यंदाच्या ऊटी पूजेनिमित्त्य फळांची सजावट करण्यात आली होती. यावेळी शेकडो भाविकांनी कैरीचे पन्हे व फळ या ठराविक प्रसादाचा लाभ घेतला. नाथवंशज सालकरी श्री सरदार महाराज गोसावी, डॉ. श्री मेघशाम महाराज गोसावी, ज्ञानराज महाराज गोसावी, विनितमहाराज गोसावी, चैतन्यभाऊ गोसावी, प्रशांत आव्हाड, संजीव बिरादार, गणेश बांगर, डोळस बाबा, गोर्डे सर, संभाजी डांगे व इतर सेवाधारी मंडळीनी सजावटीसह इतर सर्व व्यवस्था पाहिली.