फलटण :
सक्रिय राजकारण आणि समाजकारणाच्या निमित्ताने फलटण प्रमाणेच राज्यातील पत्रकारांशी आपला निकटचा संपर्क येतो, परंतू येथील पत्रकार ज्या पद्धतीने वृत्तांकन करताना वस्तुस्थिती मांडतात. अन्यायाची, विकासाची, एकाद्याच्या कार्याची महती व माहिती समोर येईल त्याच बरोबर सामाजिक प्रश्नांची योग्य मांडणी करुन ते शासन, प्रशासनासमोर मांडतातअसे गौरवोद्गार ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांनी व्यक्त केले.
मराठी पत्रकार परिषद फलटण शाखेने प्रतिवर्षीप्रमाणे पत्रकार दिनाचे निमित्ताने येथील मुधोजी क्लब मैदानावर आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धा बक्षीस वितरण सुभाषराव शिंदे यांचे हस्ते संपन्न झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता होते. यावेळी शिवराजशेठ कदम, तुषार नाईक निंबाळकर,भाऊसाहेब कापसे, माऊली सावंत,अजय माळवे,दादासाहेब चोरमले,राहुल निंबाळकर, फिरोज बागवान,सचिन भोसले, विनोद जाधव,शहर व तालुक्यातील पत्रकार, विविध क्रिकेट संघाचे खेळाडू आणि शहरातील क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.
अ. भा. मराठी पत्रकार परिषद माजी अध्यक्ष, शिवसंदेशकार, माजी आमदार कॉ. हरिभाऊ निंबाळकर यांनी केलेले मार्गदर्शन आणि घालुन दिलेल्या आदर्शानुसार येथील पत्रकारांनी वृत्तांकन तर केलेच त्याच बरोबर सामाजिक बांधीलकी आणि एकोपा जपण्यात स्व. हरिभाऊ निंबाळकर यांचे विचार व आदर्श जपल्यामुळे येथील पत्रकारांची एकभावना, संघटीत शक्ती आणि सकारात्मक विचारधारा आजही कायम असल्याचे अरविंद मेहता यांनी अध्यक्षीय भाषणात निदर्शनास आणून दिले.
पत्रकार म्हणजे समाजापेक्षा वेगळे काही ही भावना न ठेवता सतत समाजाचा एक भाग म्हणून कार्यरत राहिल्याने येथील सर्वच पत्रकारांचे राजकीय नेते, कार्यकर्ते अगदी सर्व पक्षीय मंत्री, आमदार, खासदार आणि वरिष्ठ व कनिष्ठ शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांचे संबंध नेहमीच आपुलकी व प्रेमाचे राहिल्याने या क्रिकेट स्पर्धांमध्ये राजकीय नेते, कार्यकर्ते, शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे संघ सहभागी होतात, त्यामाध्यमातून राजकीय पदाधिकारी आणि अगदी प्रांताधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यापासून अधिकारी/कर्मचारी यास्पर्धेत आपापल्या संघातून खेळतात हे या क्रिकेट स्पर्धांचे वैशिष्ट्य असल्याचे अरविंद मेहता यांनी निदर्शनास आणून दिले.
स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा चषक मराठी पत्रकार परिषद फलटण शाखेने, उपविजेता मालोजीराजे शेती विद्यालय संघ तर नगर परिषद संघाने तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले चतुर्थ क्रमांक सद्गुरु महाराज उद्योग समूहाने पटकावला. दोन दिवस चाललेले सामन्यांमध्ये वकील संघ, महसूल, पोलीस, कृषी, कृषी उत्पन्न बाजार समिती संघ, क्रेडाई, बिल्डर असोसिएशन, मुधोजी हायस्कूल कर्मचारी, यशवंतराव चव्हाण हायस्कूल कर्मचारी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी यशवंत खलाटे,शक्ती भोसले,युवराज पवार, वैभव गावडे,प्रशांत रणवरे, संजय गायकवाड, बापूराव जगताप,राजकुमार अहिवळे, सम्राट भोसले, करण भोसले, विशाल अहिवळे यांनी परिश्रम घेतले.