सातारा : राज्यातील विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शाळांच्या वेळेत बदल करण्यात आलाय. राज्यातील शाळांमध्ये एकच वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. सर्व शाळांमध्ये एकवाक्यता असावी. विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी उपलब्ध वेळेचा पुरेपूर उपयोग व्हावा, यासाठी एकच वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे.
येत्या ८ एप्रिल ते २५ एप्रिल या कालावधीत परीक्षा घेतल्या जाणार आहेत. याबाबतचे परीक्षांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे.
राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिली ते नववीच्या परीक्षा मार्चअखेरीस अथवा एप्रिल महिन्यापर्यंत होत असतात. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस वार्षिक परीक्षा पूर्ण झाल्यास त्यानंतरच्या कालावधीत शाळा सुरू होतात. पण विद्यार्थ्यांची उपस्थिती पुरेशी नसते. परीक्षांचे आयोजन वर्षअखेर करण्याऐवजी लवकर केल्यामुळे विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी मिळणारा कालावधी कमी होत असतो. प्रत्येक शाळेचे वेळापत्रक वेगवेगळे असल्याचे निदर्शनास येत असते. त्यामुळे सर्व शाळांच्या वार्षिक परीक्षा या एकाच वेळी घेण्यात याव्यात, अशा सूचना शिक्षण उपसंचालक (प्रशासन) रजनी रावडे यांनी दिल्या आहेत.